प्रत्येकाने देशसेवेसाठी कार्य करावे- जिल्हाधिकारी बलकवडे

0
19

शौर्य दिन कार्यक्रम साजरा
गोंदिया,दि.२९ : देशासाठी आपली स्वत:ची काय जबाबदारी आहे हे आपण ओळखले पाहिजे. देशसेवेसाठी ज्या सैनिकांनी बलिदान दिले ते वाया जाणार नाही. भारतीय सैन्‍य दल कुठेही मागे नाही. आपले सैनिक सीमेवर देशाची सुरक्षा करतात, त्यामुळेच आपण सुरक्षीत आहोत. त्यामुळे प्रत्येकाने देशसेवेसाठी कुशल कार्य करावे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
२९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित शौर्य दिन कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के.सवई, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुनिल कोरडे, निवासी उपजिल्हाधिकारी हरीश धार्मिक, पोलीस उपअधीक्षक (गृह) सोनाली कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जीकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगीरी राज्यातील जनतेपर्यंत व्यापक प्रमाणात पोहोचविण्यासाठी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो असे त्यांनी सांगितले.
श्री. सवई म्हणाले, आपले सैनिक हे कोणत्याही अडचणींची पर्वा न करता आपली कर्तव्ये चोखपणे बजावतात. सैनिकांच्या वर्दीमध्ये ताकद असते. सैनिक कधीही देशसेवेसाठी तत्पर असतात. सैनिकांमध्ये डिसीप्लीन असते असे त्यांनी सांगितले.
श्री. धार्मिक म्हणाले, परकीय शक्तींपासून देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी आपला सैनिक सदैव तत्पर असतो. त्यामुळेच आपण सर्वजन सुरक्षीत आहोत. देशासाठी आपण कुशल कार्य केले पाहिजे. प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता ठेवायला हवी. कधी कोणी कुठेही थुंकू नये. योग्य डिसीप्लीन ठेवून आपण देशासाठी आपले योगदान दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांच्या हस्ते वीरपत्नी श्रीमती राजश्री क्षीरसागर यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, लेखाधिकारी एल.एच.बाविस्कर, सहायक अधीक्षक आर.एच.पटले, मनोहरभाई पटेल सैनिकी शाळेचे कैलाश जांगळे यांचेसह फुलचूर हायस्कूल शाळेचे विद्यार्थी, मनोहरभाई पटेल सैनिकी शाळेचे विद्यार्थी, माजी सैनिकांच्या विधवा व माजी सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन करुन प्रास्ताविक कल्याण संघटक धनराज बावनथडे यांनी केले. उपस्थितांचे आभार कल्याण संघटक जगदिश रंगारी यांनी मानले.