पटोलेंच्या नेतृत्वात 23 ला संसदेचा घेराव

0
5

गोंदिया,दि.12 – शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर केंद्र सरकारला घेरण्यासाठी शेतकरी व शेतमजूर कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली 23 ऑक्‍टोबर रोजी दिल्लीत संसदेला घेराव घालण्यात येणार आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरूनच पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. यानंतर गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला, तसेच भाजपला रामराम ठोकून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांची शेती व शेतमजूर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती केली. राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती झाल्यानंतर नाना पटोले यांनी थेट दिल्लीत शक्ती दाखविण्याचे ठरविले आहे. येत्या 23 ऑक्‍टोबरला संसदेला घेराव करून शेतकऱ्यांचे प्रश्‍न सरकार दरबारी मांडणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.