धनगर आरक्षणासाठी टीस च्या अहवालाची गरजच काय ?  – धनंजय मुंडे

0
6

बीड(विशेष प्रतिनिधी),दि.15 – धनगर आरक्षणासाठी सरकारने नेमलेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेला कोणताही संवैधानिक अधिकार नाही, त्यामुळे या संस्थेच्या अहवालाची गरजच काय ? असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
बीड येथे महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ, धनगर समाज कर्मचारी महासंघ मल्हार सेना व अहिल्या महिला महासंघ यांच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक, कर्मचारी व समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळयात ते बोलत होते. टीस संस्थेने सरकार कडे दिलेला अहवाल धनगर समाजाच्या विरोधात असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत, त्या अनुषंगाने बोलतांना मुंडे यांनी, ज्या संस्थेला संवैधानिक अधिकारच नाहीत त्या संस्थेच्या अहवालाला किंमतच काय ? असा सवाल उपस्थित करतांना धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणत्या संस्थेच्या अहवालाची नव्हे तर इच्छाशक्तीची गरज आहे, सरकारकडे अशी इच्छाशक्ती नाही असा टोला लगावला. आरक्षण देणे तर लांबच पण टीस सारख्या संस्थाची नेमणूक हीच समाजाची पहिली मोठी फसवणूक असल्याचे मुंडे म्हणाले. सरकारच्या शैक्षणिक धोरणावरही त्यांनी कडाडून टीका केली.  शिक्षकांना जुनी पेन्शन हवी असेल तर आधी जुने सरकार आणा असे ते म्हणाले. यावेळी संयोजकांच्या वतीने मुंडे यांचा काठी आणि घोंगडी व ढोल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, प्रकाशदादा सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, डॉ. शिवाजी राऊत, सतीश शिंदे, अंकुशराव निर्मळ, संभाजीराव बैकरे व इतर मान्यवर उपस्थित होते.