आज तऱ्हाळा येथे सेंद्रिय शेती प्रशिक्षण व महिला सक्षमीकरण शिबीर

0
7

वाशिम, दि. १५ : ग्रामीण भागातील महिलांवर होणारे अत्याचार व अन्याय याला वाचा फोडून त्यांच्यामध्ये असलेली कौशल्य क्षमता विकसित करणे. घरातील कर्त्या पुरुषाची आत्महत्या झाल्यावर येणारे संकट व त्याचा सामना करण्यासाठी त्याची वैफल्यग्रस्त स्थितीतून सुटका करणे, तसेच शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून गौ आधारित ग्रामोद्योग व सेंद्रिय निविष्ठा घरच्या घरीच कशा बनवता येईल, याविषयी माहिती देण्यासाठी राज्य महिला आयोग आणि सुरभी सेवा बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त वतीने तऱ्हाळा येथील संत भायाजी महाराज संस्थान सभागृहात सेंद्रिय शेती विषयक प्रशिक्षण व महिला सक्षमीकरण शिबिराचे आज १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख या करतील. मुख्य अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पराजे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांची तर अतिथी म्हणून मंगरूळपीर पंचायत समितीच्या सभापती तुळसाबाई आमटे, उपसभापती सुभाष शिंदे, जिल्हा परिषद सदस्य जया खराबे, सरपंच रुपाली बाईस्कार, नगरपरिषद सदस्य उषाताई हिवरकर, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कोठाळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती नायर, विजय आगळे यांची उपस्थिती राहणार आहे. जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे संचालक उद्धव नेरकर यांनी केले आहे.