जलयुक्त शिवारमुळे ०.३१ मीटरने भूजल पातळीत वाढ;१ लाख १८ हजार हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण

0
10

ङ्घ ६ हजार २६८ कामे पूर्ण
ङ्घ ५९ हजार टिसीएम पाणीसाठा
ङ्घ गेल्या तीन वर्षातील कामे
ङ्घ ०.३१ मीटरने भूजल पातळीत वाढ

गोंदिया, दि. १२ :- – दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानात मागील तीन वर्षात गोंदिया जिल्हयातील २३४ गावांमध्ये ६ हजार २६८ कामे पूर्ण झाली आहेत. या कामामुळे ५९ हजार २६ टिसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून यामुळे १ लाख १८ हजार ३६१ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या कामांमुळे मागील चार वर्षात पाऊस सरासरीपेक्षा २६ टक्क्यांनी कमी होऊनही भूजल पातळीत ०.३१ मीटर वाढ झाली आहे.
जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान १३४९.६१ मि.मी. इतके असून जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये १११६.१३ मि.मी. पर्जन्यमान झाले आहे. सामान्य पर्जन्यमानाच्या तूलनेत २३३.४८ मि.मी. कमी पर्जन्यमान म्हणजे १७.०१ टक्के घट झालेली आहे. मागील चार वर्षात पर्जन्यमानात साधारणत: २६ टक्के घट झालेली आहे.
चालू वर्षात सन २०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हयात १६५ गावाची निवड करण्यात आली आहे. या गावात ३ हजार ८२ कामे प्रस्तावित करण्यात आली असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर २७ हजार ५१६ टिसीएम पाणीसाठा निर्माण होणे अपेक्षित आहे. यातून ५५ हजार ३३ हेक्टर संरक्षित सिंचन वाढेल असा अंदाज व्यकत करण्यात येत आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा गोंदिया जिल्हयाची एकूण ३३ पाणलोट क्षेत्रात विभागणी करण्यात आलेली असून पाणलोट क्षेत्रातील उताऱ्यानुसार प्रत्येक पाणलोट क्षेत्र ३ भागात रन ऑफ झोन, रिचार्ज, स्टोरेज झोन मध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. या प्रत्येक झोनमध्ये एक अशा एकूण ७९ निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सदर निरीक्षण विहिरींची सप्टेंबर २०१८ मध्ये भूजल पातळीची नोंद घेण्यात आली. या नोंदीत भूजल पातळीत ०.३१ मीटर वाढ झाल्याचे निर्दशनास आले आहे.
पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केलेल्या ७९ निरीक्षण विहिरांच्या भूजलाच्या पातळीच्या नोंदी सप्टेंबर २०१८ अखेर घेण्यात आल्या. त्यानुसार पाच वर्षाची भूजलाची सरासरी पातळी २.१७ मीटर आहे. माहे सप्टेंबर २०१८ ची सरासरी पातळी २.३५ असून ०. १८ मीटर पाणी पातळीत वाढ झालेली आहे. आमगाव, गोंदिया, गोरेगाव, सडक अर्जूनी व तिरोडा या तालुक्यात सरासरी ० ते १ मीटर भूजल पातळीत वाढ झालेली आहे.
जलयुक्त शिवार योजना राबविण्यापूर्वी सन २०१४ मध्ये गोंदिया जिल्हयाची सरासरी भूजल पातळी ही २.६६ मीटर व जलयुक्त शिवार अभियानांनंतर सप्टेंबर २०१८ मध्ये सरासरी भूजल पातळी २.३५ मीटर होती म्हणजेच ४ वर्षे पाऊस सरासरीपेक्षा २६ टक्कयानी कमी होऊनही भूजल पातळीत ०.३१ मीटरने वाढ झालेली आहे. आमगाव, गोंदिया, गोरेगाव, सडक अर्जूनी व तिरोडा या तालुक्यात सरासरी ०.२० मीटरने पाणी पातळीत वाढ झालेली आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या पाणलोट क्षेत्रनिहाय सर्वेक्षणामध्ये काही महत्वाच्या बाबी निदर्शनास आलेल्या आहेत. गोंदिया जिल्हयात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यापूर्वी पेक्षा आता ०.३१ मीटर भूजल पातळीत वाढ झालेली आहे. सलग ४ वर्षात पर्जन्यमानात घट झालेली असून भूजल पातळीत स्थिर राहण्यास मदत झालेली आहे. जलयुक्त शिवार अंतर्गत कामे पूर्ण झाल्यामुळे उपलब्ध झालेल्या पाणी साठयामुळे शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनासाठी भूजल उपलब्ध झाले आहे.