या प्रकरणातील मुख्य आरोपी आशुतोष आनंद पचारे ( रा. तकिया वार्ड, समृद्धीनगर भंडारा वय – २४) हा बजाज फायनान्समध्ये रोखपाल म्हणून काम करत होता तर दुसरा आरोपी हेमराज प्रभाकर ढेकन (रा. आयोध्यानगर साई मंदिर रोड नागपूर वय – ३२) हा प्रबंधक म्हणून कार्यरत होता. या दोन्ही आरोपींने बजाज फायनान्समध्ये ग्राहकांकडून जमा केलेला पैसा कंपनीच्या अकाऊंटमध्ये न भरता त्या पैशाने क्रिकेटवर बेटिंग केली. मागील दोन महिन्यापासून ग्राहक जो पैसा कॅश स्वरूपात भंडाऱ्याच्या या शाखेत जमा करीत होते त्या पैशाची रीतसर त्यांना पावती दिली जात होती. मात्र ही रक्कम बँकेच्या अकाऊंटमध्ये न भरता आशुतोष आणि हेमराज यांनी टप्प्याटप्प्याने हा पैसा बेटिंगसाठी वापरला. त्यांनी हा पैसा स्वतः बेटिंगसाठी वापरलाच सोबतच इतर जिल्ह्यातील शाखेच्या कर्मचाऱ्यांना या बेटिंगसाठी प्रवृत्त करुन त्यांना व्याजाने हवालाद्वारे पैसे दिले जात होते.
क्रिकेटवरची बेटिंग खेळण्यासाठी www.bsfbet.com या विशेष साईटवर जाऊन बीटकॉइनच्या माध्यमातून नागपूरच्या एका दलालांच्यामार्फत जगात कुठेही चाललेल्या क्रिकेट मॅचवर बेटिंग लावण्याचे काम केले जायचे. बेटिंग करताना पैशाचा सरळ उपयोग न करता बिटकॉईनचा उपयोग केला जायचा त्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्रासह देशातले आणि जगातले लोकही समाविष्ट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.कंपनीच्या वरिष्ठांना घोटाळा झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याची तक्रार भंडारा पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी तत्परता दाखवत या दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली करुन घेऊन त्यांच्याविरुद्ध कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर या दोन्ही आरोपींना २१ तारखेपर्यंत पीसीआर मिळाला आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपी 24 वर्षीय आशुतोष दहाव्या वर्गात असल्या पासूनच त्याला क्रिकेट बॅटिंगचा छंद लागला होता, फायनान्स मध्ये नोकरी लागल्यानंतर ही त्यांनी त्याचा हा छंद जोपासण्यासाठी कंपनीशी दगाबाजी केली.या प्रकरणाच्या तपासात आशुतोषने सांगितले की, त्याने एकदा या बेटिंगमध्ये तब्बल २५ लाख रुपये जिंकले होते. त्या रात्री तो बेटिंग करताना झोपी गेल्याने बेटिंगचा व्यवहार सतत सुरू राहिला आणि सकाळी त्याला २५ लाख जिंकल्याचे समजले. त्यानंतर त्याचा लोभ अजून वाढल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात कंपनीच्या पैशाने बेटिंग सुरू केली. मात्र सतत हरत राहिल्याने कंपनीच्या खात्यात पैसे जमा करू शकला नाही. तसेच त्यांनी स्वतःचा १ कोटीचा विमाही काढून ठेवलेला आहे. त्यामुळे तो पकडला गेला तर आत्महत्या करुन त्या माध्यमातून त्याच्या घरच्यांना आणि कंपनीच्या लोकांना पैसे मिळतील. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक चव्हाण, सहायक निरीक्षक गजाजन चेके करीत आहेत.