सरकार शिक्षण व्यवस्थाच संपवायला निघाले-नाना पटोले

0
8

आठव्या शिक्षक साहित्य समेलनाचे उदघाटन
गोंदिया,दि.21 – भारतीय लोकशाहीचा ग्रंथ म्हणजे संविधान आणि त्यातील शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणाने माणूस घडतो मात्र केंद्र व राज्यातील सत्तारुढ सरकार नवीन नवीन धोरण तयार करुन सरकारी शाळा बंद पाडण्याचा कट करीत आहे. शिक्षणाची मुळ पायरी काढून घेवून शिक्षण व्यवस्था संपविण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसच्या अखिल भारतीय किसान संघाचे अध्यक्ष व माजी खा.नाना पटोले यांनी केला आहे.
शिक्षक भारतीतर्फे आठवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी (२२ डिसेंबर) संमेलनाच्या पहिल्या दिवसाच्या सत्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी स्वागताध्यक्ष राजेंद्र झाडे, अशोक बेलसरे, अतुल देशमुख, लोककवी अरुण म्हात्रे, संस्था कार्याध्यक्ष जयवंत पाटील,अमर वराडे,महेंद्र सोनवाने उपस्थित होते. शिक्षक साहित्य संमेलनच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन खा. पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. पटोले म्हणाले, सरकारच्या धोरणाचा फटका केवळ शिक्षकांनाच बसला नसून शेतकरी आणि सर्वसामान्य जनता सुध्दा यात भरडली जात आहे. सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांनी शाळा उघडून शिक्षणाचा पाया बळकट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच प्रयत्नांमुळे महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. त्यामुळे शिक्षकांनी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा सर्वत्र प्रचार प्रसार करुन जे शिक्षण व्यवस्था संपविण्यास निघाले आहे त्यांनाच संपवून नवीन शैक्षणिक क्रांती निर्माण करण्याचे आवाहन केले.
राज्यातील सध्याच्या शिक्षणमंत्र्याचे शिक्षण किती झाले हाच संशोधनाचा खरा विषय असून त्यांच्या पदव्याबाबतही शंका व्यक्त केली जाते.ज्या शिक्षणमंत्र्याला शिक्षणाचे काहीच कळत नाही,त्या शिक्षणमंत्र्याकडून शिक्षकांची गळचेपी व शिक्षणाचा सत्यानाश करण्याचेच काम गेल्या ४ वर्षाच राज्यात झालेले आहे.वर्षाचे ३६५ दिवस होत असताना हे शिक्षण मंत्री एका वर्षात ६०० च्यावर शिक्षण विभागातील विविध विषयाचे शासन निर्णय काढतात यावरुन त्यांच्या कार्यक्षमतेचेही अवलोकन होते.तर काँग्रेस काळात ज्या कंत्राटी शिक्षकांना ४० व ६० टक्के वेतन मंजूर केले होते त्या शिक्षकांचे वेतन भाजपच्या या शिक्षणंमंत्र्याने सरसकट २० टक्यावर आणले यावरुनही या सरकारची नितिमत्ता व शिक्षणाप्रतीची आपूलकी स्पष्ट होत असल्याची टिका केली.तसेच येत्या पदवीधर शिक्षकाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीला पुर्ण सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले.
समाजाला सुशिक्षित आणि जागृत करण्याची क्षमता केवळ शिक्षकांमध्ये असल्याचे पटोले यांनी सांगितले. पाटील म्हणाले, सरकारच्या चुकीच्या व जाचक धोरणामुळे जि.प.शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. सरकार कमी पटसंख्येचे कारण देत शाळा बंद करुन शिक्षकांची कपात करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. शाळा बंद झाल्या तर संस्कारीत पिढी कशी निर्माण होईल त्यामुळे शाळा जीवंत राहू द्या असे मार्मिक मत व्यक्त केले. तर लोककवी अरुण म्हात्रे यांनी शिक्षकांंमधील सृजन आणि साहित्याला वाव मिळावा यासाठीच हे साहित्य संमेलन असल्याचे सांगितले.

सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार

शिक्षक भारतीतर्फे संमेलनादरम्यान सेवानिवृत्त मुख्याध्यापक राम अहिवले, पी.एम.बघेले, प्रकाश पंचभाई, कमल बहेकार, के.डी.धनोले, डी.एम.टेंभरे यांचा स्मृती चिन्ह व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. तर उपक्रमशील शाळा म्हणून देवरी शाळेच्या मुख्याध्यापिका रजिया बेग यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.