राज्यातील पहिली चारा छावणी गोधळेवाडीत सुरू होणार

0
14

तुकाराम महाराज यांचा उपक्रम,20 जानेवारीला आण्णा हजारे यांच्या हस्ते उद्घाटन, नोंदणी सुरू

संख,(राजेभक्षर जमादार),दि.28ः- जत तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीने जनतेचे जीवन विस्कळीत झाले, असून पाण्यासोबत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे. लोकांवर स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे माणसाने माणसासाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून तालुक्यात 158 दिवस संघर्ष दुष्काळाशी या उपक्रमातून मोफत 101 सिंटेक्स पाण्याच्या टाक्याचे वाटप तसेच जनावरांसाठी मोफत चारा छावणी उभारण्याचा संकल्प चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी केला आहे. यासाठी एक जानेवारीपासून शेतकऱ्यांनी जानावरांची नोंदणी करावी असे आवाहन तुकाराम महाराज यांनी केले.
जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथे बाबा मंगल कार्यालय येथे नोंदणी केली जाणार आहे. तर दिनांक 20 जानेवारी रोजी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते या चारा छावणीचे उद्घाटन केले होणार आहे. राज्यात प्रथमच चारा छावणी जत तालुक्यात सुरू करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.तुकाराम महाराज पुढे म्हणाले, दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी प्रशासन आपल्या परीने कार्य करत आहे. त्याच्यासोबत आपण ही आपल्या स्वखर्चातून व राज्यातील उद्योजक, कारखानदार, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, भांडवलदार, आपल्या वर प्रेम करणारे तसेच बागडे बाबांचे भक्त यांच्या माध्यमातून दुष्काळी भागातील जनतेसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कर्नाटकातील हुनगुंद, सिद्धापूरचे आढळे गुरुजी यांच्याकडून वाळलेला व हिरवा चारा उपलब्ध करून घेतला आहे. यासाठी नोंदणी होणाऱ्या जनावरांसाठी मुबलक परिसर व त्यासोबत येणाऱ्या माणसांसाठी राहण्याची, जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे 158 दिवस दुष्काळ संघर्षाचे या उपक्रमाच्या माध्यमातून दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिनांक 1 जानेवारीपासून संख रोडवरील गोंधळेवाडी बाबा मंगल कार्यालयात नोंदणी करून सहभागी व्हावे.