विकासकामांची वानवा, मोदी सरकारचा जाहिरातबाजीवर ५,२४५ कोटींची अमाप खर्च ! – आ. जयंतराव पाटील

0
11

मुंबई.( विशेष प्रतिनिधी),दि.30 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची मोठी फसवणूक केली. नोटबंदीसारखे निर्णय जनतेवर लादले. जीएसटी ची घाईघाईत अंमलबजावणी आणि त्यात सुधारणांचा खेळ सुरूच आहे. असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या कडून करण्यात आला आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, थोडक्यात जनहिताची कामे केली नाहीत. पण, तसा आव मात्र आणत असून त्यासाठी पुन्हा जनतेचाच पैसा फक्त उधळला जात आहे. मोदी सरकारने सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी तब्बल ५ हजार २४५ कोटी ७३ लाख रुपये इतकी प्रचंड रक्कम खर्च केली आहे. ही आकडेवारी सरकारकडूनच देण्यात आलेली आहे. निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी आणि भाजपाने मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली होती. या जाहिरातबाजीतून सत्ताही त्यांनी मिळवली. मग योजनांच्या नावाखाली कोट्यवधींची जाहिरातबाजी करण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी, पाणी टंचाईवर उपाययोजना व विकासकामांसाठी हे ५ हजार कोटी रुपये अधिक उपयुक्त ठरले असते, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी सांगितले.