मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला आवास योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद

0
13
  • ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात वाशिम येथून १४ लाभार्थ्यांचा सहभाग

वाशिम, दि. ०२ :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘लोकसंवाद’ कार्यक्रमांतर्गत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यभरातील आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. वाशिम जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजनेचे शहरी व ग्रामीण भागातील १४ लाभार्थी या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.

शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती घेण्यासाठी हा ‘लोक संवाद’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधत घरकुल मंजूर झाल्यापासून ते घरकुल पूर्ण झाल्यानंतरचा अनुभव जाणून घेतला. तसेच घरकुल पूर्ण होत असताना प्रशासकीय यंत्रणेकडून कशाप्रकारे सहकार्य मिळाले, याविषयी सुद्धा लाभार्थ्यांकडून माहिती घेतली.  ठाणे, लातूर, नागपूर, नाशिक जिल्ह्यातून काही लाभार्थी थेट आपल्या घरातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

वाशिम येथून सखाराम खंडागळे (अडोळी), कुंडलिक शेगोकार (पिंप्री सरहद), सुरजन चव्हाण (डव्हा), फुलाबाई चिपडे, ओम काळे (वनोजा), महानंदा सुर्जुसे (इंझोरी), गणेश परसराम तिवाले (गिव्हा कुटे) हे ग्रामीण भागातील लाभार्थी व  वाशिम नगरपरिषद क्षेत्रातील पद्माकर पद्मणे, नारायण वाघमारे, विजय जाधव, विजय परळकर, कारंजा नगरपरिषद क्षेत्रातील किरण मकेश्वर, राजेश गायकवाड, रमेश भनक, शंकर खोपे हे लाभार्थी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ‘लोक संवाद’ कार्यक्रमात सहभागी झाले होते.