92 व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या पत्नीच्या हस्ते

0
9

यवतमाळ,दि.10(विशेष प्रतिनिधी) : 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाचा पेच अखेर गुरुवारी (दि.10) सुटला आहे. साहित्य संमेलनाचे उद्घाटन राजूर येथील आत्महत्या केलेले शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली सुधाकर येडे यांच्या हस्ते होणार आहे. याबाबत मराठी साहित्य महामंडळाच्या प्रभारी अध्यक्षा विद्या देवधर यांनी माहिती दिली.

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल आमंत्रित होत्या. मात्र, राजकीय दबावामुळे अखेर संमेलनाच्या आयोजकांनीच हे आमंत्रण रद्द केल्याने गेल्या तीन चार दिवसापासून वाद रंगला होता. आता या वादावर पडदा पडला असून संमेलनाचे उद्घाटन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कळंब तालुक्यातील राजुर येथील वैशाली सुधाकर येडे असे उद्धाटनासाठी निवडण्यात आलेल्या विधवा शेतकरी महिला भगिनीचे नाव आहे. त्यांना दोन मुले असून तीन एकर शेती आहे. त्या अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून काम करतात. वरिष्ठ पत्रकार लेखक श्याम पेठकर यांनी लिहिलेल्या ‘तेरव’ या नाटकात सदर शेतकरी विधवा भगिनी काम करत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यावरून वाद निर्माण झाला होता. यावर चर्चा करण्यासाठी साहित्य महामंडळ आणि घटक संस्थांची नुकतीच बैठक पार पडली. यामध्ये उदघाटक बदलल्यामुळे नयनतारा सहगल यांचे भाषण वाचून दाखविले जाणार नाही. सहगल यांच्या बदली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी उद्घाटक म्हणून बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला, असे महामंडळाच्या सदस्यांनी सांगितले.शिवाय केवळ अधिकृत १० साहित्यिकांनी न येण्याविषयी कळवले आहे. रद्द झालेल्या दोन कार्यक्रमांऐवजी २ नवे परिसंवाद आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. संमेलन तुमच आमचे असल्याने बहिष्कार टाकलेल्या साहित्यिकांना पुन्हा सहभागी होण्याचे महामंडळाने आवाहन केले आहे.

संमेलनाच्या उद्‍घाटनाला मुख्यमंत्री येणार नाहीत- येरावार
मुख्यमंत्री शुक्रवारी (ता.11) वाराणसीला आणि पक्षाचा कामासाठी दिल्लीला जाणार असल्याने ते या संमेलनाच्या उद्‍घातानाला उपस्थित राहू शकणार नाहीत, मात्र, 12 किंवा 13 रोजी येण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती पालकमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष मदन येरावार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.