यवतमाळ,दि.11(विशेष प्रतिनिधी) – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीमध्ये 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा सुरू झाला आहे.संमेलनाच्या उद्घाटकाचा मान मिळालेल्या राजूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वैशाली सुधारक येडे व संमेलनाध्यक्ष डॉ. अरणा ढेरे यांच्या हस्ते रिमोटद्वारे दीपप्रज्वलन करण्यात आले. यंदा संमेलनात प्रथमच संविधानाची प्रत ठेवण्यात आली आहे. सुरुवातीला आयोजक संस्थेचे कार्याध्यक्ष डाॅ. रमाकांत कोलते यांचे भाषण झाले. यवतमाळ संमेलनाला राज्य शासनाकडून 50 लाख रुपये निधी मिळाला आहे. याआधी संमेलनाला 25 लाख मिळत होता, असे डॉ. कोलते यांनी सांगितले.
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ग्रंथ प्रदर्शनास भेट दिली. तत्पूर्वी, सकाळी दहाच्या सुमारास निघालेल्या ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनातील कार्यक्रमांना सुरुवात झाली. यवतमाळच्या नागरिकांनी मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडीत सहभाग नोंदवला. यवतमाळचे रस्ते हा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दीने फुलले होते.शुक्रवारी सकाळी येरावार चौक येथून सुरू झालेल्या ग्रंथ दिंडीने 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची अनौपचारिक सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारा सोहळा या संपूर्ण ग्रंथ दिंडीच्या मिरवणुकीत पाहायला मिळाला. गेले ८ दिवस वादाचे सावट असले तरी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी लक्ष्मिकांत देशमुख म्हणाले.