‘लोकसंवाद‘ कार्यक्रमात गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी हितगुज

0
13

*शेती व्यवस्थापन डिजिटली ट्रॅक करणाऱ्या ‘महा ॲग्रीटेक‘ योजनेचा मुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ*
*दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ*
गोंदिया,दि.14 : पेरणी ते पीक काढणी या प्रत्येक टप्प्यावर पेरणी क्षेत्र, हवामान, पिकांवरील रोग अशा विविध बाबी डिजिटली ट्रॅक करुन शेतकऱ्यांना माहिती देणाऱ्या देशातल्या अशा प्रकारच्या पहिल्या ‘महा ॲग्रीटेकङ्क योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘लोकसंवाद‘ कार्यक्रमात केला. उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या या उपक्रमामुळे वेळीच माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांना उपाययोजना करणे शक्य होणार आहे. एमआरसॅक आणि इस्त्रोच्या सहाय्याने राज्य शासन हा कार्यक्रम अंमलात आणत आहे.
राज्य शासनातर्फे सुरु करण्यात आलेल्या ‘लोकसंवाद‘ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांनी आज राज्यभरातील शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधला.

मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिर, बोडी खोलीकरण,मागेल त्याला बोडी, जलयुक्त शिवार, शेती यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना, फळप्रक्रिया उद्योग या सह कृषि विभागाच्या अनेक महत्वांकाक्षी योजनेच्या गोंदिया जिल्हयातील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्हिडिओ कॉन्सफरन्सद्वारे संवाद साधला. या
संवादामुळे कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकरी सुखावले असून लाभार्थ्यांनी  मुख्यमंत्र्यांशी मनमोकळा संवाद साधला. गोंदिया जिल्हयातील बाबुलाल गौतम, नरेंद्र हरिणखेडे, चित्रकला चौधरी,रानु रहांगडाले, चेतन कापगते, मदनलाल पटले, ललिता चव्हाण व भारती येले यांनी मुख्यमंत्र्यांसोबत थेट संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांचे आस्थेवाईकपणे विचारपूस केली. गोदिया जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हिडिओ काँफरन्समध्ये कृषि विभागाच्या विविध योजनेचे 30 ते 35 लाभार्थी सहभागी झाले होते.
बाबुलाल गौतम- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत 80 हजाराचे कर्ज माफ झाले आहे. एकात्मिक धान खरेदी योजना, दुष्काळी मदत व मावा-तुडतुडा
मदत थेट बँक खात्यात जमा झाली आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला सरकार धाऊन आल्याने आपण आभारी आहोत, अशी भावना मोहगाव तालुका गोरेगाव येथील
अल्पभूधारक शेतकरी बाबुलाल गौतम यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली.
नरेंद्र हरिणखेडे- कटंगी तालुका गोरेगाव येथील शेतकरी नरेंद्र हरिणखेडे यांनी जलयुक्त शिवार व सिंचन विहिरीच्या माध्यमातून वर्षात दोन पीके घेत असल्याचे सांगितले . यासोबतच शेतकरी सन्मान योजनेत 49 हजाराचे कर्ज माफ झाले आहे. जलयुक्त शिवारमुळे शेती सुजलाम सुफलाम होण्यास  लाभदायक  ठरणार असल्याचे सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र यांचे आभार व्यक्त केले.
चेतन कापगते- बायोगॅस योजनेचा लाभ मिळाल्यामुळे जंगलतोड बंद झाली असून बायोगॅसच्या माध्यमातून शेतीसाठी खत उपलब्ध होत आहे. याचा लाभ सेंद्रियशेती करण्यास होत आहे, असे  सडक अर्जुर्नी तालुक्यातील बोपाबोडी येथील शेतकरी चेतन कापगते यांनी सांगितले. शेतकरी सन्मान योजनेत 1.41 लाखाचे कर्ज माफ झाले असून शेत अवजारे योजनेत लाभ मिळाला आहे.
 रतनलाल पटले- मागेल त्याला बोडी या योजनेत बोडी मिळाल्याने बोडीमध्ये शिंगाडा लागवड करुन 3 लाखाचे उत्पन्न घेतले. शासन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा विचार करीत आहे. मात्र आमचे उत्पन्न चार पटीने वाढले असल्याचे बिहिरीया ता. तिरोडा येथील शेतकरी रतनलाल पटले यांनी सांगितले. आपल्या सोबतच 25 ते 30 शेतकऱ्यांनी बोडया घेतल्याचे ते म्हणाले. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मी गोंदियाला येईल तेव्हा शिंगाडे खाऊ घाला.पुढील नोव्हेंबरमध्ये या अवश्य शिंगाडे खाऊ घालतो, असे आग्रहाचे निमंत्रण
पटले यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.यावेळी चित्रकला चौधरी, ललिता चव्हाण व भारती येले   यांनी मुख्यमंत्र्यांशी मनमोकळा संवाद साधून आपल्याला मिळालेल्या कृषि
योजनेच्या लाभाची माहिती दिली.  जांभूळ टोला येथील भारती येले यांनी फळ प्रक्रिया उद्योग सुरु केला असून त्यांच्या या प्रयोगाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
*बीई एमबीए झालेली तरुणी शेतीकडे वळली*
राणू रहांगडाले-गोंदिया जिल्ह्यातील राणू रहांगडाले या तरुणीने बीई इलेक्ट्रॉनिकचे शिक्षण घेतले. एमबीए केले. मात्र ती शेतीकडे वळली. आता सध्या ३५ एकर शेतीवरील भाजीपाल्यासह पपई, केळी यांचे उत्पादन घेते. स्ट्रॉबेरी पिकविते. यासाठी तिने सिंचन योजनांचा लाभ घेतला. शेती करताना शासनाच्या विविध योजनांमुळे कसा फायदा झाला. हे अनुभव सांगताना राणूने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राणूच्या शेती व्यवसायाकडे वळण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. उच्च शिक्षित असूनही शेती करताय याबद्दल तुमचे अभिनंदन असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

*मुख्यमंत्र्यांना आवडतो हातसडी तांदळाचा भात*
पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करताना शेतकरी आपल्या भागातील चिकू, नारळ, पपई, पेरु या फळांसोबतच विविध भाज्या आणि फुलांची माहिती देत होते. माझ्या घरी पालघर जिल्ह्यात पिकणारा हातसडीचा तांदूळ मी नेहमी आणतो. या तांदळाचा भात पौष्टिक असतो. तो मला आवडतो, असे कौतुकाचे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढताच पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आनंद अवर्णनीय होता.