आयुष्यमान भारत योजनेमुळे समाजातील गरीब रुग्णांवर सुलभतेने उपचाराची सुविधा – मुख्यमंत्री

0
9

नागपूर,दि.१९: समाजातील वंचित व गरीब रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सुलभपणे सुविधा उपलब्ध होत आहेत. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून राज्यातील 90 टक्के जनतेला उपचाराचा लाभ मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारला व्यक्त केला.
पूर्व नागपुरातील भवानी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सहा मजली इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे यांच्यासह श्री भवानी माता सेवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
धावपळीच्या युगात आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना अल्पदरात आणि त्यांना परवडेल असे उपचार होणे आवश्यक आहे. भवानी हॉस्पिटलच्या माध्यमातून गरीब रुग्णांवर अल्पदरात आधुनिक पद्धतीने उपचार व्हावेत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
श्री. भवानी माता सेवा समितीने मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट सुरु केल्यामुळे या भागासह जिल्ह्यातील गरीब रुग्णांना अल्प दरात वैद्यकीय सुविधा मिळाव्यात. त्यांना उपचारासाठी दूर जाण्याची गरज राहणार नाही. केंद्र शासनाने आयुष्यमान भारत आणि राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु केल्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
श्री. भवानी माता सेवा समिती ट्रस्टने विक्रमी वेळेत रुग्णालय सुरु करून या भागातील गोरगरीबांसाठी सेवा सुरु करुन दिली आहे. या रुग्णालयाचा मुख्य हेतू सेवाभाव असून रुग्णसेवेची प्रेरणा ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मिळाली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष प्रयत्नामुळे १०० टक्के अनुदानावर सौरपॅनेल बसवल्यामुळे येत्या २५ वर्षासाठी हॉस्पिटलचा वीजबिलाचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे हॉस्पिटल स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासोबतच गरीब रुग्णांना अल्पदरात सर्वोत्तम सेवा देण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्री. भवानी माता सेवा समितीला केले.
यावेळी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, सोलार इंडियाचे सत्यनारायण नुवाल, हल्दीराम फूड्सचे शिवकिशन अग्रवाल, माजी आमदार मोहन मते, नागपूर नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे, सुरुची फूड्सचे सुभाष जैन आणि सोनू मोनू इंडस्ट्रीजचे अशोक गोयल आदी उपस्थित होते.