जल आणि वन विषयाला शालेय अभ्यासक्रमात सहभागी करण्यात येईल : ना. मुनगंटीवार

0
6

चंद्रपूरमधून महाराष्ट्रव्यापी जलसंवाद यात्रेला सुरूवात
* जलपुरुष राजेंद्र सिंग यांनी पिकांचे पावसाच्या ऋतुचक्राची सांगड घालण्याचे केले आवाहन
चंद्रपूर, दि.14 फेब्रुवारी : महाराष्ट्रात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करतानाच जल आणि वन याबद्दलची आत्मियता अगदी प्राथमिक स्तरावर निर्माण व्हावी, यासाठी शालेय शिक्षणात या संदर्भातील विषय अभ्यासक्रमात असावेत यासाठी निश्‍चित प्रयत्न केले जातील, असे आश्वासन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिले.
चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधीनी चंद्रपूर तथा विभागीय जलसाक्षरता केंद्र चंद्रपूर यांच्यावतीने जलसाक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपल्या उद्घाटनीय भाषणात ते बोलत होते.
व्यासपीठावर जल पुरुष डॉ. राजेंद्र सिंग, जलयोद्धा किशोर धारिया, यशदा जलसाक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे, जलयोद्धा देवाजी तोफा, जलनायक मोहन हिराबाई, चंद्रपूर वन प्रशासन प्रबोधिनीचे संचालक अशोक खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, अधीक्षक अभियंता वेमलकुंडा, आनंद पुसावळे, जलयुद्ध कौस्तुभ आमटे, प्रशांत खाडे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले जलयोद्धा, जलप्रेमी उपस्थित होते.
महाराष्ट्रात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जल व्यवस्थापन करणे काळाची गरज बनली आहे. या अनुषंगाने नागपूर विभागात जलसंवर्धन, संरक्षण, जनजागृती याचबरोबर जल व्यवस्थापन करण्यासाठी जलयोध्दा, जलनायक, जलदूत, जनकर्मी यांची अनिवासी एक दिवशीय कार्यशाळा जलपुरुष डॉं. राजेंद्र सिंग यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली होती. चंद्रपूर वरुन जलसाक्षरतेचा संदेश देणाऱ्या जलसंवाद यात्रेची त्यांच्या उपस्थितीत जलकुंभ हाती देऊन सुरुवात झाली.
या कार्यक्रमाला संबोधीत करताना ना. मुनगंटीवार यांनी जल पुरुष डॉ. राजेंद्र सिंग यांचे जलसाक्षरतेबद्दल राज्य शासनाला वेळोवेळी मिळत असलेल्या मार्गदर्शना बद्दल आभार मानले . ते म्हणाले, शिक्षण विभागाचे खाते आपल्याकडे जरी नसले तरी महाराष्ट्र शासन जल आणि जंगल याबाबतीत अतिशय जागरूकपणे काम करत असून जलपुरुष श्री. राजेंद्र सिंग यांनी दिलेल्या या प्रस्तावाची निश्चितच दखल घेईल.
चंद्रपूरच्या जल प्रबोधिनीमधून महाराष्ट्रात जलसाक्षरतेच्या संदर्भात प्रचार-प्रसार करण्यासाठी आज जलसंवाद यात्रा सुरू करण्यात आली. या जलसंवाद यात्रेला हिरवी झेंडी त्यांनी दाखवली. या संवाद यात्रेमध्ये राज्यातील सर्व वनाधिकारी निश्चित सहभागी होतील असेही त्यांनी सांगितले.
पाणी व्यवस्थापन, जलसंधारण, शाश्वत जलसाठे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांची पूर्ण टीम अतिशय सकारात्मक आहे. मोठ्या प्रमाणात या संदर्भात काम झाले आहे. त्यामुळे जलसाक्षरतेचाबाबत जल पुरुष डॉ. राजेंद्र सिंग यांच्याकडून आलेल्या कोणत्याही सूचनेचे राज्य सरकार कायम स्वागत करत आले आहे आणि यापुढे देखील स्वागत करेल.
तत्पूर्वी जल पुरुष डॉ. राजेंद्र सिंग यांनी यावेळी उपस्थित जल प्रेमी नागरिकांना संबोधित करताना महाराष्ट्रामध्ये आता पिकाचे चक्र पावसाच्या चक्राशी एकरूप होणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. आपल्या भागातील वृक्षांची संख्या कमी झाल्यामुळे ऋतू बदलले आहे. नियमित पाऊस ज्या भागात पडत होता. त्या ठिकाणच्या वृक्षाची कमतरता पुढे राहणार नाही. यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. पाण्याचे साठे वाढवले की हिरवळ वाढते आणि हळूहळू हिरवळ वाढली की त्या ठिकाणी पावसाचे चक्र निश्चित होते. त्यामुळे हिरवळ वाढविण्यासाठी आगामी काळामध्ये नियोजनबद्धपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगीतले. या कार्यक्रमाचे संचालन हेमंत शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अप्पर संचालक प्रशांत खाडे यांनी केले.