४० गावे होणार सुजलाम सुफलाम : बडोले

0
13

सडक अर्जुनी,दि. दि.१४ः- :पूर्व विदर्भ विकास योजनेंतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन उपकेंद्राच्या नियोजित ठिकाणी करण्यात आले. याचा लाभ या परिसरातील चाळीस गावांना मिळणार असल्याने या परिसरातील शेती सुजलाम सुफलाम होईल, असे उद्गार सामाजिक न्याय व विशेष साहाय्य तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

शेंडा येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी (दि.११) करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. सभापती गिरधारी हत्तीमारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य सरिता कापगते, शीला चव्हाण, उपसभापती राजेश कठाणे, सरपंच मोहनलाल बोरकर, पं.स.सदस्य गीता टेंभरे, माजी सभापती कविता रंगारी, पद्मा परतेकी, कोयलारीचे सरपंच फुलन धुर्वे, पुतळीचे सरपंच गीता कापगते, माजी सरपंच कमला वैद्य, उपसरपंच वच्छला मरस्कोल्हे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ओंकार बारापात्रे, मुख्य अभियंता सुखदेव शेरकर व देवरीचे कार्यकारी अभियंता सुहास धामणकर उपस्थित होते..

बडोले पुढे म्हणाले, शेंडा परिसरात आदिवासी शेतकऱ्यांची संख्या बऱ्याच प्रमाणात आहे. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांकडे स्वत:च्या सिंचनाच्या सोई उपलब्ध आहेत. मात्र विद्युत दाब फारच कमी राहात असल्याने वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होतो. याचा फटका शेतकऱ्यांना बसत होता. या परिसरातील जनतेच्या विद्युत विषयीच्या तक्रारी निवेदन व वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित होत होत्या. याची दखल घेऊन या समस्येचे निराकरण करण्यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. यावर बावनकुळे यांनी या कामाला त्वरित मंजुरी देऊन पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्याचेच फलीत म्हणून आज या गावात ३३ के.व्ही. चे विद्युत उपकेंद्र उभारण्यात येत असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची मदत दिली जाणार असल्याचे सांगितले. शेरकर यांनी प्रास्ताविकातून येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. या उपकेंद्रांतर्गत शेंडा, सालईटोला व डोंगरगाव असे तीन फिडर निघणार असून प्रत्येक फिडरची लांबी १५ कि.मी. असेल. याचा लाभ परिसरातील ४० गावांना मिळणार असून कमी विद्युत दाबाच्या समस्येतून सुटका मिळणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अनिल मेश्राम यांनी केले तर आभार अभियंता परिहार यांनी मानले. कार्यक्रमासाठी कनिष्ठ अभियंता एच.के. टेंभुर्णीकर, लाईनमन पी.एच. गिऱ्हेपुंजे, एच.एम. भगत, एस.एस. हनवते, आर.डी. कुंभरे, जी.के. सहकुरे, एन.पी. जयस्वाल, निशांत मांदाडे, चेतन राऊत, रणजित पातोडे यांनी सहकार्य केले..