देशात भाजपा सरकारबद्दल तीव्र असंतोष, आघाडी ३५ जागा जिंकेल – प्रफुल्ल पटेल

0
19

२० फेब्रुवारीला नांदेड आणि २३ तारखेला परळी-वैजनाथला राष्ट्रवादी-काँग्रेसची एकत्र सभा

मुंबई,दि.14(वृत्तसंस्था)ःः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संसदीय मंडळाची बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा.प्रफुल पटेल म्हणाले की बैठकीत राज्यातील संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा झाली.काही इच्छुक उमेदवारांशीही चर्चा करून चार-पाच दिवसात उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यात येईल.तसेच दिल्लीतील बैठकीत महाराष्ट्रात आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत बैठक झाल्यावर आघाडीवर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती पटेल यांनी दिली. देशातील भाजपा सरकारविरोधी असंतोष पाहता आमची आघाडी राज्यात ३५ जागा जिंकू शकेल. पवारसाहेबांनी माढातून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याबाबत लवकरच अधिकृत निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीनंतर अजित पवार यांनीही माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीत सर्वांनी एकमुखाने पवारसाहेबांनी निवडणूक लढवावी असा आग्रह धरला, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्वांचा आग्रह असला, तरी यावर पवारसाहेब लवकरच निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडी, राजू शेट्टी आणि इतर मित्रपक्षांसोबत राज ठाकरे यांच्याबाबतही आमची चर्चा झाली. काँग्रेसच्या नेत्यांसह पुन्हा बैठक होईल. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विशेष अधिकार आहेत. पवारसाहेब आणि जयंत पाटील पुढील निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.२० फेब्रुवारीला नांदेड आणि २३ तारखेला परळी-वैजनाथ येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र सभा घेणार असल्याचेही ते म्हणाले. या बैठकीला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ,खासदार सुप्रिया सुळे,विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते गणेश नाईक, डॉ. राजेंद्र शिंगणे, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन अहिर आदी उपस्थित होते.