अहेरी नजीकच्या प्राणहिता नदीत दोघांना जलसमाधी

0
13

गडचिरोली(अशोक दुर्गम),दि.16ः- महाराष्ट्र-तेलंगाणा सिमेला लागून वाहणार्या प्राणहिता नदीपात्रात दुचाकीस्वार पडल्याने जलसमाधी मिळाल्याची घटना आज घडली.अहेरी तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या वांगेपल्लीनजीकच्या प्राणहिता नदीपात्रात दुचाकी कोसळून जावई व सास-याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. दिनकर रेड्डी पोरेड्डीवार (४८) रा. कागजनगर (तेलंगणा) आणि बापुराव येमनुरवार (६५), रा.अहेरी अशी मृतांची नावे आहेत.१ वाजताच्या सुमारास जावई दिनकर रेड्डी पोरेड्डीवार व सासरे बापूराव यमनूरवार हे एमएच ३३ के ३१६८ क्रमांकाच्या दुचाकीने कागजनगरकडे निघाले. प्राणहिता नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने खालच्या बाजूने उभारलेल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या लोखंडी पूलावरून ते दुचाकीने जात होते. दरम्यान या पुलावरून तोल गेल्याने त्यांची दुचाकी खाली कोसळली व दोघांचाही नदीत बुडून मृत्यू झाला.
दुपारी २.३० वाजताच्या सुमारास दिनकर पोरेड्डीवार यांचा तसेच बापूराव यांचा मृतदेह दुपारी ४ वाजता तरंगताना दिसला. घटनेची माहिती मिळताच अहेरीचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधाकर कुमरे, पोलीस हवालदार बेगलाजी दुर्गे, रवींद्र चौधरी, रोहनकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्यातील दोन्ही मृतदेह बाहेर काढले.