नागपूरचे ‘आयआयएम’ जगात सर्वोत्कृष्ट ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
18

नागपूर,दि.07 : व्यवस्थापन क्षेत्रात ‘आयआयएम’ने स्वत:ची अशी एक ओळख निर्माण केली असून व्यवस्थापन शास्त्रातील जागतिक दर्जाचे शिक्षण येथून घेऊन अनेकजण आपली कारकीर्द घडवित आहेत. अशा प्रकारची दर्जेदार आणि नामवंत संस्था नागपूर येथे सुरु झाली आहे, हे गौरवास्पद असून येथील ‘आयआयएम’ जगात सर्वार्थाने सर्वोत्कृष्ट ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मिहान येथे ‘आयआयएम’ नागपूरच्या नवीन कॅम्पसचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी होते तर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार कृपाल तुमाने, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, समीर मेघे,  महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, नागपूर ‘आयआयएम’च्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष सी. पी. गुरुनानी उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्तांना कौशल्य विकास योजनेअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमाणपत्र युवकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूर येथे ‘आयआयएम’ कॅम्पसचे भूमिपूजन होत आहे, ही बाब नागपूरकरांसाठी अत्यंत आनंददायी आहे. 2015 पासून नागपूर येथील ‘आयआयएम’मध्ये अभ्यासक्रम सुरु झाले आहेत. आता येथील कॅम्पसच्या इमारतीची उभारणी सुरु होणार आहे. सर्व सुविधांनीयुक्त व सुसज्ज असणारे जगातील वैशिष्ट्यपूर्ण असे हे कॅम्पस ठरेल. ही इमारत पर्यावरणपूरक राहणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

व्यवस्थापन क्षेत्रातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘आयआयएम’च्या माध्यमातून पूर्ण होत असतात. ‘आयआयएम’च्या माध्यमातून व्यवस्थापन क्षेत्रात एक प्रकारची क्रांती घडून आली आहे. नागपूर येथील ‘आयआयएम’ हे सर्वोत्कृष्ट ‘आयआयएम’ ठरेल. येथील भूमिपुत्रांना आवश्यक प्रशिक्षण देऊन मिहान येथील उद्योगक्षेत्रात रोजगार संधी उपलब्ध करुन देण्याचे महत्त्वपूर्ण काम ‘आयआयएम’ व मिहानमार्फत होत आहे. हे सर्वंकष विकासाचे सर्वोत्तम उदाहरण ठरणार आहे. याद्वारे सर्वसामान्यांच्या आयुष्यात  मोठे परिवर्तन घडणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

उद्योग, व्यापार आणि मनुष्यबळ यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्योग आणि व्यापाराची उभारणी केवळ कुशल मनुष्यबळावरच होऊ शकते. दर्जेदार कुशल मनुष्यबळ ही आज काळाची महत्त्वपूर्ण गरज बनली आहे. पुण्याचे उदाहरण यादृष्टीने महत्त्वाचे ठरते. पुण्यात सर्वप्रथम शैक्षणिक क्रांती झाली. त्यानंतर तेथे औद्योगिकीकरण वाढले व त्यानंतरची माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील क्रांती आपण पाहत आहोत. याचाच अर्थ दर्जेदार कुशल मनुष्यबळ कोणतीही अवघड आव्हाने पेलण्यासाठी सक्षम असते. ‘आयआयएम, ‘एम्स’, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी व ट्रिपल ‘आयआयटी’ यासारख्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून नागपूर येथे नाविन्यपूर्ण शिक्षणप्रणाली रुजत आहे. मिहान येथील उद्योग आणि व्यापाराच्या उभारणीसाठी हा पाया ठरणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

सर्वार्थाने देशाच्या मध्यभागी असल्याने नागपूर आता लॉजिस्टिक हब बनत आहे. विविध प्रकारच्या वितरण प्रणालींसाठी हे उपयुक्त ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर व विदर्भात मोठे उद्योग उभारले जाणार आहेत. काही उद्योगांची सुरुवातही झाली आहे. अजनी येथे पॅसेंजर हब तयार होत आहे. तर वर्धा परिसरात कार्गो हबची उभारणी होत आहे. ‘रेल-रोड-एअर’ अशा पद्धतीची ‘कनेक्टिव्हिटी’ तयार होत आहे. यातून मोठे बदल घडणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, जागतिक दर्जाचे ‘आयआयएम’ नागपूर येथे साकारले जाणार आहे. या संस्थेची  इमारत अत्याधुनिक, सुसज्ज व पर्यावरणपूरक असणार आहे. व्यवस्थापन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रकल्प व प्रयोग येथे साकारले जातील. लॉजिस्टिक संदर्भातील अभ्यासक्रम व प्रशिक्षण यांचाही यामध्ये प्राधान्याने समावेश असावा. ‘आयआयएम’ आणि मिहानच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे. नागपूर आता लॉजिस्टिक व कार्गो हब बनत आहे. रिंगरोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या अनेक पायाभूत सुविधांच्या उभारणीची कामे होत असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले.‘आयआयएम’च्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष सी. पी. गुरुनानी यांनी आभार मानले.