आरक्षणामुळे सत्ता मिळाली, रिमोट कंट्रोल मात्र नवऱ्याकडे

0
23

नागपूर,दि.10 : आरक्षणामुळे महिलांना राजकारणात वाटा मिळाला. पण महिलांची मानसिकता अजूनही बदलली नाही. गुलामीच्या चाब्या आजही त्यांनी आपल्या कंबरेला खोचून ठेवल्या आहेत. आरक्षणामुळे महिलांना सत्ता मिळविता आली. पण खुर्ची सांभाळता आली नाही. ती आजही सत्तेची बाहुली असून, सत्तेचा रिमोट मात्र नवऱ्याच्या हाती दिला असल्याची भावना जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिला वक्त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, असोसिएशन ऑफ पीस अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट व बापुजी समाज कल्याण बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात शनिवारी करण्यात आले.. यानिमित्त ‘आजच्या राजकीय परिस्थितीत स्त्रियांचे महत्त्वङ्क या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या विषयावर बोलताना वक्ता म्हणून डॉ. अंजली साळवे विटणकर व सुषमा भड म्हणाल्या की, प्रत्येक राजकीय पक्षाकडे महिला आघाडी आहे. पण या महिला आघाडीला कुठलेही स्थान नाही. महिला आघाडीने पक्षासोबत बार्गेनिंग केले नाही. जे पक्षाकडून मिळाले ते सहज स्व्ीाकारले. त्यामुळे राजकीय स्थान मिळणार तरी कसे? तीळसंक्रांतीच्या कार्यक्रमाला गठ्ठ्याने महिला एकमेकांच्या घरी जातात. पण स्त्री सक्षमीकरणाचे वैचारिक मंथन होत असताना बोटावर मोजण्याइतपतच महिला उपस्थित असतात. कारण महिलांना गुलामगिरीतच राहण्याची सवय झाली आहे. त्यांचे लक्ष स्वतंत्र कपडे, दागिने, टीव्ही, घर यातच आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शरयू तायवाडे, निर्मला मानमोडे, सुनील जुमळे उपस्थित होते. याप्रसंगी खेळाडू सुनिता धोटे, माधुरी चौधरी व शोभा राऊत यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकातून अ‍ॅड. रेखा बारहाते यांनी महिला सक्षमीकरणावर भर देत महिलांनीच यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. संचालन अ‍ॅड. समीक्षा गणेशे, आभार नंदा देशमुख यांनी मानले.