एसपीच्या वाहनाला स्क्रॅचेस,सहा पोलीस कर्मचारी निलंबित

0
27
गोंदिया,दि.14 : जिल्हा पोलिस अधीक्षकपदाची सुत्रे विनीता शाहू यांनी (२८ फेबु्रवारीला) हाती घेतल्यानंतर आपली कार्यप्रणाली कशी राहणार हे प्रसार माध्यमासमोर सांगितले होते. जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने सुरक्षिततेबाबत कोणतीही हयगय चालणार नाही, अशी सूचनाच सर्वच पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी दिली होती; परंतु पोलीस मुख्यालयातील विश्रामगृहासमोर उभ्या असलेल्या पोलीस अधीक्षकांच्या वाहनालाच १२ मार्च रोजी इजा(स्क्रचेस) पोहोचल्याने सुरक्षेच्यादृष्टीने कार्यरत ६ पोलीस कर्मचार्‍यांना दोषी धरुन त्या कर्मचार्‍यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबित केल्याचे प्रकरण समोर आले आहे.विशेष म्हणजे यापुर्वी दिलीप पाटील भुजबळ हे पोलीस अधिक्षक असतांना त्यांच्या शासकीय निवासस्थानातील चिकू तोडल्याप्रकरणी पोलीसावंर कारवाई करण्यात आली होती.
पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांचे वाहन १२ मार्च रोजी पोलीस मुख्यालयातील विश्रामगृहासमोर सुरक्षेच्या दृष्टीने गार्ड संरक्षणामध्ये ठेवण्यात आले होते. यामध्ये पो.हवा. पंकज पांडे, पो.हवा. चमनलाल नेताम, नापोशी सुरेश चव्हान, पोलीस शिपाई कैलाश कलाधार, पोलीस शिपाई रोहित चव्हाण सर्व कार्यरत पोलीस मुख्यालय व पोलीस शिपाई छोटेलाल बिसेन पोलिस ठाणे रामनगर हे त्यावेळी कार्यरत होते. पोलीस अधीक्षकांचे वाहन संरक्षणात असताना वाहनांवर अज्ञात इसमांनी घसाटा व स्व्रैâच मारल्याचे निदर्शनास आले. हे सर्व पोलीस कर्मचारी संरक्षणामध्ये तैनात असताना असे झालेच कसे हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.तसेच जिल्हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील आहे.अशावेळी सर्व पोलीस कर्मचारी अत्यंत जबाबदार कर्तव्य पदावर कार्यरत असताना शिस्तबद्ध पोलीस विभागास ही न शोभणारी व बेजबाबदारपणाची कार्यप्रणाली असल्याचे दिसून आल्याचे निलबंन आदेशात म्हटले आहे. या सर्वांना प्राथमिक व विभागीय चौकशी कार्यवाहीच्या अधिन राहून मुंबई पोलीस अधिनियम १९५६ च्या नियम ३ व पोर्ट नियमान्वये आदेश निर्गमित दिनांकापासून म्हणजेच १३ मार्चपासून तत्काळ प्रभावात शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांनी काढले आहे.तसेच या सर्व कर्मचार्‍यांना यापुढे अर्जुनी मोरगाव येथील पोलीस ठाण्यात राहावे लागणार असून दररोज सकाळ व संध्याकाळ हजेरीपटावर स्वाक्षरी करावयाची आहे.
निलंबित कर्मचारी निलंबन काळात खाजगी नोकरी अथवा धंदा केल्यास त्यांची कृती महाराष्ट्र नागरी सेवा अन्वये गैरवर्तवणूक समजण्यात येईल व ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ही ठरतील असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे. या कारवाईने नोकरी काळात हयगय करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.