डाॅ.फुके आज हनुमंताच्या चरणी,सोमवारला भरणार अर्ज

0
12

गोंदिया,दि.23ः-येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने राज्यातील बहुतांश मतदारसंघातील उमेदावारांच्या नावाची घोषणा केली आहे.मात्र विदर्भातील चर्चेत असलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावावर अद्यापही संस्पेस कायम ठेवला आहे.विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनेही अद्याप आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नसली तरी तिथे प्रफुल पटेल म्हणतील ते अंतिम असते.यातच आपली उमेदवारी पक्की असल्याचे विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय रमेश फुके यांना माहित असल्याने त्यांनी आढावा बैठकासंह सामाजिक बैठकांनाही सुरवात केली आहे.त्यातच आज शनिवारला(दि.23) ते भंडारा जिल्ह्यातील प्रसिध्द असलेेले हनुमान मंदिर चांदपूर येथे दर्शनासाठी जाणार आहेत.

चांदपूर येथे आज दर्शन घेऊन तिथेच त्या भागातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.त्यांच्या वाढलेल्या भेटीगाठी व मंदिराकडे वळलेली पाऊले ही उमेदवारी निश्चित असल्याचे संकेत असून सोमवारला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे वृत्त आहे.त्यासाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजपचे लोकसभा प्रभारी व जिल्हाध्यक्षांना मोठ्या संख्यने कार्यकर्त्यांना घेऊन येण्याकरीता निर्देश देण्यात आले आहेत.त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान 5 ते 7 चारचाकी वाहन उपलब्ध करुन दिले गेले आहे.अशा 200 ते 300 वाहनातून भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी रवाना होणार आहेत.फुके हे मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात जाऊन भेट घेत असून युवकांनाही पक्षात आणू लागले आहेत.या निवडणुकीत विधानपरिषदेसारखी मदत माजी खासदार नाना पटोले करतात की आघाडीला सहकार्य करतात याकडेही जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांच्या नावाची जी यादी पहिली घोषित केली,त्या यादीमध्ये भंडारा नगराध्यक्षांचे नाव आल्याने ती घोषणा थांबविण्यात आल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.तर दुसरीकडे पक्षातील जे नेते खासदारकीसाठी इच्छुक आहेत,त्यांना तुम्हालाच उमेदवारी मिळेल घाई करु नका हा संदेश देण्यासाठीच ही घोषणा जाणिवपुर्वक ताटकळत ठेवण्यात येत असल्याचीही माहिती समोर आली आहे.त्यातच मध्यप्रदेशातील भाजपच्या एका नेत्याने वरिष्टाकंडे कुठल्याही पोवार समाजातील उमेदवाराल तिकिटच देऊ नये यासाठी शिष्टमंडळासहच धाव घेतल्याच्या चर्चेला उधाण आल्याने त्यात कितपत सत्यता आहे हे सांगता येणे जरी कठीण आहे. तरी त्या मध्यप्रदेशातील नेत्याने गेल्या पाच वर्षात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील भाजपमधील पोवार नेत्यामधील भांडण संपुष्ठात आणण्याएैवजी एकमेकाविरुध्द भांडण लावण्याच्याच प्रयाेग करुन समाजाच्या खच्चीकरणाला हातभार लावल्याचे काहींचे म्हणने आहे.