पहिल्या टप्प्यात सरासरी 68.7% मतदान,विदर्भात मतांचा टक्का घटला

0
12

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)दि.12- पहिल्या टप्प्यात २० राज्यांच्या ९१ जागांवर ६६% मतदान झाले. निवडणूक आयोग अनेक राज्यांची फक्त ५ वाजेपर्यंतची टक्केवारी देऊ शकला. २०१४ मध्ये या ९१ जागांवर ७२% मतदान झाले होते. देशाच्या १० राज्यांचे मतदान संपले. या राज्यांत ६८.७१% मतदान झाले. २०१४ मध्ये या १० राज्यांच्या ५६ जागांवर ७५.०५% मतदान झाले होते. ४% मतदान वाढल्याचा फायदा भाजपला झाला. त्यामुळे जेथे भाजपचा आधी खासदार नव्हता त्या राज्यांतही २०१४ मध्ये पक्षाने खाते उघडले होते. भाजपला १०, काँग्रेसला फक्त ६, तर ४० जागा प्रादेशिक पक्षांना मिळाल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, वर्धा आणि यवतमाळ-वाशीम अशा सात लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ५५.९७ टक्के मतदानाची नाेंद झाली. प्रचंड उन्हाच्या धास्तीने सर्वच मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात रांगा लागलेल्या होत्या. दुपारी अनेक ठिकाणी शुकशुकाट जाणवला. ऊन ओसरल्यावर सायंकाळी मतदारांनी पुन्हा गर्दी केली. किरकोळ घटना वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. २०१४ मध्ये या ७ मतदारसंघात सरासरी ६४.२० % मतदान झाले हाेते. यंदा घटलेला मतटक्का काेणाच्या पथ्यावर पडताे याची धास्ती युती व आघाडीला पडली आहे.

२०१४ मध्ये ९१ जागी मतदानात वाढ, भाजपच्या २५ जागा वाढल्या होत्या
ज्या ९१ जागांवर गुरुवारी मतदान झाले तेथे २००९ मध्ये भाजपने ७, काँग्रेसने ५५ जागा जिंकल्या होत्या. २०१४ मध्ये या ९१ जागी ७२ % मतदान झाले होते. मतदानात वाढ झाल्याने चित्र बदलले. काँग्रेसला फक्त ७ जागा मिळाल्या. भाजपला २५ जागा वाढून तो पक्ष ३२ वर पोहोचला होता. तेदेपला १६ आणि टीआरएसला ११ जागा मिळाल्या होत्या.

२०१४ मध्ये भाजपला एकूण जागांपैकी ११.३% पहिल्या टप्प्यातच
पहिल्या टप्प्याचे मतदान झालेल्या राज्यांपैकी भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचलच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. आसामच्या ५ पैकी ४, महाराष्ट्रातील ७ पैकी ५, बिहारच्या ४ पैकी ३ जागांवर विजय मिळवला होता.

मतदानाच्या कलाचा निकालावर परिणाम

> २०१४ मध्ये ४% मतदान वाढले होते, तेव्हा या १० राज्यांच्या ५६ जागांपैकी भाजपला ९ जागांचा फायदा झाला होता, काँग्रेसला ३७ जागांचा फटका

> २००९ मध्ये या १० राज्यांत ७०.९४% मतदान झाले होते, तेव्हा काँग्रेसला ३४ जागांवर मिळाला होता विजय, भाजपला मिळाली होती फक्त १ जागा