क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

0
16

मुंबई,दि.15ःः 2019 आयसीसीच्या वन-डे विश्वचषकासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीची मुंबईत बैठक पार पडली. यात 2019 क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. निवड समितीने संघाची धुरा विराट कोहलीकडे सोपवली आहे तर उपकर्णधारपदी रोहीत शर्मा असणार आहे. निवड समितीने जाहिर केलेल्या टीममध्ये हे खेळाडू आहेत. विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, विजय शंकर, महेद्रसिंह धोनी(यष्टीरक्षक), केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजूवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी.

भारतीय संघनिवडीची शेवटची तारीख 23 एप्रिल होती, मात्र आज आठ दिवस आधीच म्हणजे 15 एप्रिलला भारताचा 15 सदस्यीय वर्ल्ड कप संघ जाहीर होत आहे. एकदिवसीय विश्वचषकाला 30 मे पासून इंग्लंडमध्ये सुरूवात होत आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार असून, 16 जून ला भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे.यावर्षीपासून वर्ल्डकपमध्ये एक टीम सर्व संघांसोबत सामने खेळणार आहे. या फेरीनंतर पहिले चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. अंतिम सामना 14 जुलैला खेळवण्यात येईल. 1983 आणि 2011 चा विश्वचषक जिंकलेल्या टीम इंडियात कोणत्या 15 खेळाडूंना स्थान मिळणार याबाबत उत्सुकता होती. भारतीय संघातील बहुतेक खेळाडूंची नावे निश्चित झाली होती, मात्र चौथ्या क्रमांकावर कोण याबाबत संघव्यवस्थापनाला विचार करत होते, पण आता चौथ्या स्थानासाठी के. एल. राहुलची निवड करण्यात आली आहे.

46 दिवसात 48 सामने
यंदा विश्वचषकाच्या 46 दिवसांत तब्बल 48 सामने होणार आहेत. गतविजेता ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना 1 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध आहे.