आज थंडावणार दुसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा

0
20

मुंबई,दि.16 : आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार असून येत्या गुरुवारी म्हणजेच 18 एप्रिल 2019 रोजी महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. देशभरातील 13 राज्यांमधील एकूण 97 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.चार टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात मतदान होणार असून विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्रातील एकूण दहा जागांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश आहे. मतदानाची प्रक्रिया विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर शहर या मतदारसंघांमध्ये पार पडेल.

तर देशातील आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी या राज्यांमध्ये मतदान होणार आहे. आज संध्याकाळी सहा वाजता या मतदारसंघांच्या प्रचारतोफा थंडावणार आहेत. याआधी युती, आघाडीच्या उमेदवारांकडून अंतिम टप्प्यात सर्वसामान्यांच्या भेटी, सभांचा जोर वाढलेला आहे. गुरुवार 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील.