भूमिपूजन वादाच्या भोवर्‍यात, आचारसंहितेचा भंग

0
10

पवनी,दि.21ः-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक डॉ. आंबेडकर चौक परिसराच्या सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. आदर्श आचारसंहीतेचा भंग केल्याने नगरपरिषद अध्यक्षांसहीत उपस्थित शासकीय कर्मचारी व इतरांवर कारवाई करावी, याबाबतची तक्रार डॉ. राजेश नंदुरकर यांनी निवडणूक अधिकारी भंडारा- गोंदिया लोकसभा क्षेत्र यांना दिल्याची माहिती पत्रकार परिषदेतून दिली.
नंदुरकर यांनी सांगितले की, भंडारा- गोंदिया लोकसभा क्षेत्रात दि. ११ एप्रिलला मतदान झाले. राज्यात तीन टप्प्यात निवडणुका आहेत. जरी भंडारा लोकसभा क्षेत्रात मतदान संपले असले तरी राज्यात इतर ठिकाणी मतदान शिल्लक आहे. त्यामुळे पूर्णराज्यात आदर्श आचारसंहीत लागू असून कुठेही शिथील करण्यात आली नाही. असे असतानाही नगरपरिषदेच्या सर्वसाधारण फंडातून डॉ. बाबासाहेब आंबेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून न.प. अध्यक्षा पूनम काटेखाये यांनी सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले.
यावेळी नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचार संहितेचा भंग करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून पदमुक्त करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी डॉ. नंदुरकर यांनी यावेळी केली.