येदरबुची व संदुरटोल्यातील आदिवासींची पाण्यासाठी पायपीट

0
19

तुमसर,दि.09 : तालुक्यातील येदरबुची व सुंदरटोला या आदिवासीबहुल गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून सुमारे १२०० नागरिकांची तहान शेतातील एक विहीर भागवित आहे.पाण्यासाठी अख्खे गाव पहाटे गावापासून एक ते दीड कि.मी. अंतरावरील त्या शेतातील विहिरीकडे धाव घेत आहेत.सदर गावातील ४० विहिरी सध्या कोरड्या पडल्या असून सात हातपंपापैकी ५ हातपंपाला पाणी नाही. संपूर्ण गाव थेंब-थेंब पाण्याकरिता विहिरीवर सध्या प्रतीक्षा करीत आहे.त्यातच बावनथडी प्रकल्प जवळ असतांना नागरिकांचे घसा मात्र पाण्याविना कोरडा अशी स्थिती आहे.या सर्वपरिस्थितीकडे बघून काँग्रेसचे युवा नेते डाॅ.पकंज कारेमोरे यांनी शासनाच्या पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरल्या असून त्या कोट्यवधीच्या योजनेचा काय उपयोग असा प्रश्न उपस्थित करीत आदिवासी समाजाची सरकार अवहेलना करीत असल्याची टिका केली आहे.

तुमसर तालुक्यात बावनथडी, वैनगंगा अशा नद्या आहेत. तलावांची संख्या ही मोठी आहे. परंतु पाण्याचे नियोजन नसल्याने दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. येदरबुची, सुंदरटोला या आदिवासी बहुल गावात पाण्याकरिता दाही दिशा भटकावे लागत आहे.सदर गावातील ४० विहिरी सध्या कोरड्या पडल्या आहेत. गावाशेजारी एक शासकीय व एक खासगी तलाव कोरडा पडला आहे.
सात हातपंप असून त्यापैकी पाच हातपंप कोरडे पडले आहेत. २५० ते ३०० फुट पर्यंत खोदकाम केल्यावरही पाणी लागले नाही. एका हातपंपातून अल्प प्रमाणात पाणी येते तर दुसऱ्या हातपंपाचे पाणी लालसर येत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. लोहखनीज तत्वाचा या पाण्यात समावेश अधिक आहे. गावापासून एक ते दीड कि.मी. अंतरावर शेतात एक विहिर असून तिथे समस्त ग्रामस्थ पाणी आणण्याकरिता भल्या पहाटे जातात. उर्वरीत ग्रामस्थांना थेंब थेंब पाणी जमा होईपर्यंत तीन ते चार तास प्रतीक्षा करावीलागते. अंधारात पाण्याकरिता अख्खे गाव येथे पायपीट करीत आहे.
सदर गावात पेयजल योजना कार्यान्वित असून जलकुंभ तयार करण्यात आले आहे. बावनथडी प्रकल्पाला सदर पेयजल योजना जोडली आहे. ३० हजार लिटरचे जलकुंभ आठवड्यातून एकदाच अर्धे भरण्यात येत आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल टेकाम व ग्रामस्थांनी दिली. मागील पाच वर्षापासून परिसरात दुष्काळ व पाणी टंचाई भेडसावत आहे. विहिरींचे खोदकाम करताना खाली दगड येथे लागतात.सदर परिसर सातपुडा पर्वत रांगांत जंगलात वसला आहे. प्रशासनाच्या योजना केवळ कागदावर रंगवताना अधिकारी दिसतात, असा आरोप अनिल टेकाम यांनी केला आहे.