विदेशात एमआर्कचे शिक्षण घेणारी नियती राजगडकर ठरली पहिली आदिवासी विद्यार्थिनी

0
37
गडचिरोली,दि.११: अलिकडे आदिवासी मुला-मुलींमध्येही शिक्षणविषयक जागृती निर्माण होत असून, शिक्षणाचं प्रमाणही वाढत आहे. आदिवासी विद्यार्थी आता विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊ लागले आहेत.त्यातच नियती प्रभू राजगडकर या विद्यार्थिनीची ‘मास्टर ऑफ आर्किटेक्चर’ या अभ्यासक्रमासाठी आस्ट्रेलियाच्या विद्यापीठात निवड झाली आहे. आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी विदेशात निवड झालेली नियती राजगडकर ही बहुदा पहिलीच आदिवासी विद्यार्थिनी असावी, असा अंदाज आहे.
आदिवासींमध्ये शिक्षणाच प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. खेड्यापड्यातील मुलं-मुली जवळच्या जिल्हा परिषद शाळेत जाऊ लागले. आश्रमशाळांनीही बऱ्याच आदिवासी विद्यार्थ्यांना दिलासा दिला. आदिवासी मुला-मुलींचा पूर्वी बीए, एमए अशा कला शाखाकडे कल असायचा. परंतु काळ बदलला तशी ही मुलं-मुली विज्ञान शाखेकडे वळू लागली. नव्या पिढीतील तरुण मुलं-मुली एमबीबीएस, एमडी, इंजिनिअर होऊ लागले. चांगल्या पदावर काम करू लागले. अनेक जण स्वतंत्रपणे आपला व्यवसायही करीत आहेत. अलिकडे आदिवासीमधील मुलं-मुली परदेशातही शिकायला जाऊ लागले. परंतु ते डॉक्टर, इंजिनिअर, पीएचडी(अपवादानेच) होण्यासाठी. अर्थात हे प्रमाण तसं कमीच. आर्किटेक्ट या विद्या शाखेकडे आदिवासी मुला-मुलींचा फारसा कल दिसून येत नाही. फार अपवादानेच ही मुले या
शाखेकडे वळतात.
मात्र, नियती राजगडकर हिने बारावीनंतर जाणीवपूर्वक आर्किटेक्ट विद्याशाखा निवडली. तिने पुण्याच्या महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या भानुबेन नानावटी(कमिन्स )कालेज येथे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पदव्युतर शिक्षणासाठी तिने आस्ट्रेलियातील   डिकेन युनिव्हर्सिटीत (मेलबॉर्न) प्रवेशासाठी अर्ज केला. त्यासाठीची परीक्षा दिली. तिला एम.आर्क (मास्टर ऑफ आकिटेक्ट) करिता प्रवेश मिळाला. हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा असून तिने एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. पदवीच्या दुसऱ्या वर्षाला तिने ‘आदिवासी कल्चरल सेंटर’ असा थिसीसचा विषय निवडला होता. त्याकरिता संपूर्ण गडचिरोली जिल्हा फिरून काढला. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’चे डॉ.गोगुलवार दाम्पत्य, लेखामेंढा इत्यादी ठिकाणी भेटी देऊन आदिवासी संस्कृती जाणून घेतली. विदेशात शिक्षणासाठी नियतीला राज्य शासनातर्फे परदेश शिक्षणासाठीची शिष्यवृत्तीही मिळाली.
नियती राजगडकर हिचे वडील प्रभू राजगडकर यांनी गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्षे घालवली आहेत. येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अशी अनेक महत्वाची पदे त्यांनी भूषविली असून, आदिवासी विचारवंत व कवी म्हणूनही त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या आदिवासी संस्कृतीविषयीच्या अभ्यासाचाहीही नियतीला फायदा झाला.