‘जलयुक्त’ चे अपयश झाकण्यास टँकरची मागणी दाबली जात आहे; काँग्रेसचा आरोप

0
13

मुंबई,दि.12 : राज्यभरात दुष्काळाची तीव्रता प्रचंड वाढली असताना चाऱ्याविना पशू व पाण्याविना जनतेला तडफडत ठेवण्याचे काम सरकार करत आहे. हजारो टँकरची मागणी असताना जलयुक्त शिवार योजनेचे सपशेल अपयश आणि त्यातील भ्रष्टाचार जनतेला जाणवेल म्हणून टँकरची मागणी पूर्ण न करता ती दाबून ठेवण्याचे काम केले जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
सावंत म्हणाले, राज्यात दुष्काळाची परिस्थिती पाहता दहा हजारांपेक्षाही अधिक टँकरची मागणी अनेक गावातून येत आहे. आजवर पाणीपुरवठा विभागाच्या आकडेवारीनुसार केवळ ५१७४ टँकरने  पाणी दिले जात आहे. गावातून आलेली मागणी लालफितीतच अडकवून ठेवण्याचे सरकारचे निर्देश असल्याचे समजते. गावा-गावात एका टँकरच्या मागे गावकरी पाण्यासाठी तुटून पडल्याचे चित्र दिसत आहे. हे चित्र अत्यंत विदारक आणि संतापजनक असून केवळ जलयुक्त शिवारमध्ये खर्च केलेले हजारो कोटी रुपये कोणाच्या घशात गेले हा प्रश्न जनता विचारेल म्हणूनच टँकरची मागणी पूर्ण केली जात नाही. असे असले तरी जलयुक्त शिवारचे अपयश व त्यातील भ्रष्टाचाराची लक्तरे ही वेशीवर टांगली गेली आहेत हे पूर्पणपणे सत्य आहे.