आपत्तीच्या परिस्थितीत सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

0
17

हिंगोली, दि. 15 : येणा-या मान्सून ऋतुचा विचार करता व जिल्ह्यातील पुरप्रवण 70 गावे गृहीत धरुन सर्व विभागांनी परस्परात समन्वय ठेवून कामे करण्याची सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मान्सून पुर्वतयारी बैठकीत श्री. जयवंशी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक कीशोर श्रीवास, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहीत कंजे आदिसह सर्व विभागांचे विभागप्रमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री. जयवंशी म्हणाले की, तालुकास्तरावर तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी नियंत्रण कक्ष स्थापन करुन तालुका आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा व या आराखड्यात पुरप्रवण गावांचा समावेश करावा. तसेच पोलीस प्रशासनाने पोलीस स्टेशन निहाय अधिकारी यांचे नावे व भ्रमणध्वनी याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास विहीत नमुन्यात सादर करुन तालुका निहाय तयार करण्यात आलेले शोध व बचाव पथक अद्ययावत करण्याची सुचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिली.
आरोग्य विभागानेही नियंत्रण कक्ष स्थापन करुन आपत्ती व्यवस्थापन करिता नोडल ऑफीसरची नियुक्ती करावी व तसा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास त्वरीत सादर करावा. तसेच जिल्हा परिषदेनेही आपल्या अंतर्गत येणा-या आरोग्य विभागासह इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय राखण्याची सुचनाही यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.
नगरपालीका प्रशासनास सुचना देतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, नगरपालिका प्रशासनानेही नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करुन , अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवावीव आपत्ती व्यवस्थापन करीता नोडल ऑफीसरची नियुक्ती करावी. वस्तीमध्ये पाणी शिरणार नाही याकरीता योग्य ते नियोजन करुन शहरातील नाल्याची दुरुस्ती करावी जेणेकरुन शहरामध्ये पाणी तुंबणार नाही व पाण्याचा विसर्ग होण्यास मदत होईल असेही जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले.
रेल्वे प्रशासन, राज्य परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, भारत संचार निगम लिमिटेड, राज्य राखीव पोलीस दल क्र. 12, गृहरक्षक दल या बरोबरच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत असणा-या विभागांनाही जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी सुचना देतांना, आपत्ती व्यवस्थापासंबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्याचा दुरध्वनी क्रमांक 02456-222560 तर टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधण्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने तयार केलेल्या आपत्ती व्यवस्थापन परिस्थीतीत काय करावे व काय करु नये? यासंबंधीत लघुपटाचे उद्घाटन करण्यात आले.