नक्षलवाद्यांनी पत्रकातून स्वीकारली भूसुरूंग स्फोटाची जबाबदारी

0
15

गडचिरोली,दि.18 : जिल्ह्यातील भामरागड-आरेवाडा या नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांनी पत्रके टाकत त्या पत्रकांमध्ये कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे १ मे रोजी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. १९ मे रोजी रविवारी नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात बंदचे आवाहन केले आहे. यासाठी एटापल्ली, भामरागड तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलपत्रके टाकली.

या पत्रकांमध्ये जांभुळखेडाच्या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. मागील वर्षी भामरागड तालुक्यातील कसनासूर येथे ४० नक्षलवादी ठार झाले होते. या घटनेचा बदला घेण्यासाठी जांभुळखेडा येथे भूसुरूंग स्फोट घडवून आणला आहे. हा भूसुरूंग स्फोट घडवून आणण्यात सहकार्य करणा-या स्थानिक नक्षलवाद्यांचे कौतुकसुद्धा पत्रकातून केले आहे. तसेच सरकारच्या नितीवर जोरदार टीका केली आहे.सुरजागड लोहप्रकल्पालाही नक्षलवाद्यांनी विरोध दर्शविला आहे. दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात नक्षलपत्रके टाकून नक्षलवादी आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशातच रविवारी १९ मे रोजी बंदचे आवाहन केल्याने दुर्गम भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे नक्षलवाद्यांच्या स्फोटात त्यांना मरण आले

एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे नक्षलवाद्यांच्या स्फोटात त्यांना मरण आले ते अतिशय क्लेशदायक आहे. आमचे संसार उद्ध्वस्त करणाºया त्या अधिका-याला निलंबित करा. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी आर्त मागणी शहीद पोलीस जवानांच्या वीरपत्नींनी केली आहे.१ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भूसुरूंग स्फोटात कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) शैलेश काळे यांच्या नेतृत्वाखालील क्युआरटी पथकातील १५ जवान आणि त्यांना घेऊन जाणा-या खासगी मालवाहू वाहनाच्या चालकाला वीरमरण आले. त्यातून सावरत आठ शहीद जवानांच्या वीरपत्नी व एका जवानाच्या बहिणीसह इतर कुटुंबियांनी गुरुवारी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले.काळे यांची नंदुरबार येथे बदली करण्यात आली. पण त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. याचा अर्थ पोलीस विभाग त्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येते, असे वीरपत्नी म्हणाल्या