झारखंडमध्ये नक्षल्यांकडून आयईडी स्फोट, 16 जवान जखमी

0
19

रांची(वृत्तसंस्था) – झारखंडच्या सरायकेला खरसावा येथे नक्षलवाद्यांनी आज मंगळवारी सकाळी आयईडी ब्लास्ट घडवला. या स्फोटात पोलिस आणि 209 कोबरा पथकाचे 16 जवान जखमी झाले. त्यापैकी 7 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस अधीक्षक चंदन कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, स्फोट घडवल्यानंतर नक्षल्यांनी जवानांवर फायरिंग देखील केली. ही घटना राय सिंदरी डोंगर परिसरात घडली आहे. दरम्यान, जखमी जवानांना तातडीने उपचारास नेण्यासाठी एअर अॅम्बुलेंसची मदत घेण्यात आली आहे. त्या सर्वांना राची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफची विशेष टीम कोबरा आणि झारखंडच्या जग्वार जवानांनी सकाळी लाँग रेंज गस्त लावली. सर्च ऑपरेशनवरून परत येत असताना त्यांना लक्ष्य करून बॉम्बस्फोट घडवण्यात आला. यानंतर गोळीबार देखील झाला. सध्या परिसरात चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पसार झालेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, गडचिरोलीत 30 एप्रिल रोजी नक्षल्यांनी पोलिसांना लक्ष्य करून हल्ला केला होता. त्यामध्ये 15 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी नक्षलवाद्यांनी रस्ते बांधकाम करणाऱ्या 30 वाहनांना आग लावली होती.