करंजी गावात दोन दिवसापासून अग्नितांडव

0
20

आमगाव,दि.10 : तालुक्यातील करंजी येथे गेल्या काही दिवसांपासून अग्नितांडव सुरु आहे. यात तीन गोठे व एक घर जळून खाक झाल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशाने लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बुधवारी (दि.५) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मोहनलाल तावाडे व भरतराम तावाडे या भावंडांच्या घराला आग लागून संपूर्ण घर व गोठा जळून खाक झाला. यात बैलगाडी, नांगर, शेती उपयोगी साहित्य व जनावरांचा चारा जळून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच दुसऱ्याच दिवशी गुरुवारी (दि.६) सकाळी आत्माराम गायधने यांच्या घराला अचानक आग लागून त्यांचेही घर पूर्णत: जळून खाक झाले. यात त्यांच्या घरातील जीवनोपयोगी व शेती उपयोगी साहित्य जळून लाखोंचे नुकसान झाले.
तर दुपारी १२ वाजताच्या सुमारास उदाराम फुंडे यांच्या गोठ्याला अचानक आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटना मानवी कृत्याने की शॉटसर्किटने घडल्या याचे कारण अद्यापही कळू शकले नाही.