भामरागड, अहेरी तालुक्यातील १00 गावांचा संपर्क तुटला

0
23

गडचिरोली,दि.30ः- गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग बंद आहेत. तसेच भामरागड व अहेरी तालुक्यातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे.तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे.  मुसळधार पाऊस पडल्याने नद्या व नाले दुथडी भरुन वाहत आहेत. चामोर्शी तालुक्यातील दिना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने चौडमपल्ली नाल्याला पूर आला आहे. यामुळे आष्टी-आलापल्ली मार्ग बंद झाला आहे. छत्तीसगड राज्यातील जगदलपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्याने भामरागडजवळून वाहणारी इंद्रावती नदी फुगून वाहत आहे.
भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आलापल्ली-भामरागड रस्ताही बंद झाला आहे. भामरागड तालुक्यातील दूरध्वनीसेवा व वीजपुरवठा ठप्प आहे. पेरमिलीजवळच्या नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने पेरमिली-भामरागड मार्ग बंद आहे. अहेरीनजीकच्या गडअहेरी पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शिवाय याच तालुक्यातील देवलमरी-व्यंकटापूर, तसेच अहेरी-महागाव हा रस्ताही पुरामुळे बंद झाला आहे. आलापल्ली-सिरोंचा मार्गही बंद झाला आहे.
आष्टी – आलापल्ली मार्गावर दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील आणखी काही लहान पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे मार्ग बंद झाले आहेत. बल्लारपूर – आष्टी मार्गावरील दहेली गावाजवळ निर्माण करण्यात आलेला रपटा वाहून गेल्याने तिथेही वाहतूक खोळंबली आहे.