बचतगटाच्या महिलांना मिळणार सायबर सुरक्षेचे धडे

0
26

मुंबईदि. 2 : राज्यातील बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण सुरू असून त्यातून त्या आर्थिक सक्षम होत आहेत. या महिलांना डिजिटल युगात वावरताना इंटरनेटचा सुयोग्य वापर करण्यासंबंधी मार्गदर्शन व्हावे व सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती व्हावीयासाठी राज्य महिला आयोग आणि महाराष्ट्र सायबर यांच्या वतीने प्रज्ज्वला उपक्रमाच्या माध्यमातून या महिलांसाठी सायबर सुरक्षेविषयी राज्यभर कार्यशाळा घेण्यात येत आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे नुकत्याच या कार्यशाळा झाल्या आहेत.

राज्य महिला आयोगामार्फत प्रज्वला उपक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये कायदा व अर्थ विषयक जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र सायबरच्या माध्यमातून सायबर सुरक्षा विषयावर राज्यभर या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. इंटरनेटमुळे समाजमाध्यमांचा वापर वाढला आहे. त्यातून अनेकदा समाजाच्या सांस्कृतिक व सार्वजनिक जीवनावर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यातून सायबर गुन्हे घडत आहेत. यामुळे सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी काय उपाय योजना कराव्यातयाबाबत महिला आयोग व महाराष्ट्र सायबरच्या माध्यमातून अनेक ठिकाणी बचत गटाच्या महिलांसाठी जनजागृती विषयक कार्यशाळा घेण्यात येत आहेत. यासाठी महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

यासंबंधी महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर म्हणाल्याऑनलाईन जगात महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य महिला आयोग आणि महाराष्ट्र सायबर यांनी हाती घेतलेली सायबर सुरक्षा जनजागृती मोहीम सर्वच स्तरांवरील महिलांना अत्यंत फायद्याची ठरणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात आयोगामार्फत आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये सायबर सुरक्षा विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. यातून महिलांना डिजिटल युगात सुरक्षितपणे राहता येईल. इंटरनेटचा सुरु असलेला अमर्यादित वापर आणि प्रचंड संख्येने वाढत असलेले स्मार्ट फोनचे वापरकर्ते या परिस्थितीत सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर कायद्यांबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल जनजागृती अत्यंत महत्वाची ठरते. सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठीच्या विविध पद्धती आणि सायबर विषयक कायदे जाणून घेणे महत्वाचे असून इतरांनाही त्याबद्दल माहिती देणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. यासाठीच राज्य महिला आयोगाचे विविध अधिकारीमहाराष्ट्र सायबरचे अधिकारी आणि प्रत्येक जिल्ह्यांमधील विविध संस्था एकत्र येणार आहेत. सायबर गुन्हे हा सामाजिक सलोखा आणि सुरक्षे पुढे निर्माण झालेले आव्हान असून ते पेलण्यासाठी सर्वांनी एकत्र यावेअसे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी केले.

महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत म्हणालेप्रज्वला योजने अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील. आर्थिक सक्षम झालेल्या महिलांना आर्थिक गोष्टींची सुरक्षा राखण्यासाठी तसेच डिजिटल युगात इंटरनेटचा योग्य वापर करण्यासाठी महाराष्ट्र सायबरच्या कार्यक्रमाची मदत महिलांना होणार आहे.