दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणमधून पाणी देण्याचा निर्णय – पालकमंत्री रामदास कदम

0
9

स्वातंत्र्यदिन ध्वजवंदनाचा मुख्य समारंभ उत्साहात संपन्न

नांदेड(नरेश तुप्तेवार),दि.15ः– मराठवाड्यात सातत्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असून यासाठी मराठवाड्यास कोकणमधून पाणी देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यास हा मोठा दिलासा ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 72 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री श्री कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शुभेच्छा संदेश देतांना ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात राष्ट्रध्वज वंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या समारंभात जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, महापौर श्रीमती दिक्षा धबाले, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड, समाज कल्याण सभापती श्रीमती शिलाताई निखाते, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, जिल्हा परिषद, महापालिकेतील पदाधिकारी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक त्यांचे कुटूंबीय, माजी सैनिक, विविध विभागांचे अधिकारी , कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक आदिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शुभेच्छा संदेशात पालकमंत्री श्री. कदम यांनी अनेकांच्या बलिदानातून भारताला स्वतंत्र्य मिळाले असून आम्ही सारे भारतीय एक आहोत असे स्पष्ट करुन स्वातंत्र्य दिनी आज पहिल्यांदा जम्मू काश्मिरमध्ये भारताचा तिरंगा फडकत आहे. याचा सर्व भारतीयांना अभिमान असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे धन्यवाद मानले.
पालकमंत्री श्री. कदम पुढे म्हणाले राज्यात सांगली, कोल्हापूर, सातारामध्ये अतिवृष्टी झाली तर आज मराठवाडा तहानलेला आहे. मराठवाड्यावर निसर्गाची अवकृपा होत असून शेतकरी आकाशाकडे डोळे भरुन पाहत आहेत. कोकणमधून मराठवाड्याला पाणी देण्याचा निर्णयाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पावसाचे पाणी जमिनीत साठवण्याचा जलपुनर्भरणाचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. हा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरापुरता मर्यादेत न राहता शहरी / ग्रामीण भागात हा उपक्रम राबविला पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न केल्यास आपण दुष्काळाशी सहज सामना करु शकतो. टंचाईसह विविध विकास कामांसाठी राज्य शासन मराठवाड्याच्या सदैव पाठीशी राहील, असे सांगून पालकमंत्री रामदास कदम यांनी सर्वांना भारतीय स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी पालकमंत्री श्री. कदम यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी, नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांची आस्थेवाईकपणे विचारपूसही केली.
कार्यक्रमात पालकमंत्री श्री. कदम यांच्या हस्ते राष्ट्रपतीपदक प्राप्त सहायक पोलीस उपनिरीक्षक खामराव वानखेडे, अविनाश सातपूते तर चीनमध्ये जागतीक पॅरा ॲथेलेटिक्स क्रीडा स्पर्धेत गोलाफेक व भालाफेकमध्ये कास्यपदक प्राप्त दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षा राष्ट्रीय स्तरातून शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले 13 विद्यार्थी, सीबीएसई बोर्ड परीक्षेत गुणवंत विद्यार्थी हर्षवर्धन जाजू, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्यावतीने गुणवत्तापात्र शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले 35 विद्यार्थी, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2017 साठी प्रथम पुरस्कार ज्ञानेश्वरी व्हिजन फाउंडेशनचे श्री पाठक व द्वितीय पुरस्कार अल-इम्रान प्रतिष्ठान बिलोलीचे अध्यक्ष मोहसीन खान, सचिव इम्रान खान पाठण यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पालकमंत्री रामदास कदम यांचे हस्ते दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना गॅस वितरण करण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूराने बाधित नागरिकांसाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी येथील दत्ता देशमुख, विजय देशमुख, विक्रांत देशमुख, बालाजी नरंगले तसेच पत्रकारांकडून यावेळी धनादेश पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे सुपूर्द केला. शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी सुत्रसंचालन केले.
पालकमंत्री कदम यांच्या हस्ते रेन वॉटर हार्वेस्टींगचे उद्घाटन
येथील जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या पुढाकारातून लोकसहभागातून पावसाच्या पाण्याचे साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) उपक्रमाचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.