राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे

0
5

अर्जुनी मोरगाव,दि.19ः-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष हे लोकहितासाठी झटणारे पक्ष असून सर्वसामान्य बहुजनांचे हित जोपासणारे पक्ष असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. आचारसंहिता लागण्यापूर्वी जनसमस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
ते राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग तालुका अर्जुनी मोरगाव तर्फे आयोजित सभेत बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष जि.प.सदस्य मनोज डोंगरे होते.अतिथी म्हणून जि प सदस्य किशोर तरोणे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, आर के जांभूळकर, सुरेश खोब्रागडे, धार्मिक गणवीर, उद्धव मेहंदळे, पुष्पा गदवार, दिपक सोनवाने, उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, राज्यातील युती सरकार हे खोटारडे आहे. शेतकऱ्यांची सातत्याने दिशाभूल केली जात आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ वेळेवर मिळत नाही. शेतकऱ्यांच्या विजपंपांना जोडणी केली जात नाही. जीवनावश्यक गॅस महागाईच्या भडक्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडत आहेत. पेट्रोल दराने वाहनधारकांचे कंबरडे मोडले आहे.तरीही केवळ पोकळ आश्वासने दिली जात आहेत. मराठवाड्यात दुष्काळ आहे, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे मात्र मुख्यमंत्री महाजनाधार यात्रेत व्यस्त आहेत. जनताजनार्धन आता दुधखुळे राहिलेले नाहीत सर्वांना युती शासनाचे हे खोटारडे धोरण अनुभवयास येत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत युतीला जनता निश्चितपणे धडा शिकवेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.के.जाभुळकर, संचालन उद्धव मेहंदळे यांनी तर उपस्थितांचे आभार अजय शहारे यांनी मानले.