मी तर लगेच दिला होता राजीनामा- अडवानी

0
12

वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२८,- भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्र सरकारच्या कारभारावर नाराज असणारे भाजपमधील ‘पितामह‘ लालकृष्ण अडवानी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नेत्यांनी मूल्ये आणि नैतिकता टिकवून ठेवली पाहिजे. माझ्यावर हवालाचा आरोप केला गेला, मात्र मी त्यावेळी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता, अशा शब्दांत अप्रत्यक्षरीत्या अडवानी यांनी मोदींवर वार केला.

पश्चिम बंगालमधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अडवानी यांनी ललित मोदी प्रकरणाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अडवानी म्हणाले, ‘सार्वजनिक जीवनात सत्यनिष्ठा कायम राखणे आवश्यक आहे.‘ दरम्यान, त्यांनी सुषमा स्वराज आणि वसुंधराराजे यांच्यावर काही टिप्पणी केली नाही.
यापूर्वी अडवानी यांनी मोदींवर टीका करताना ‘देशात आणीबाणीची परिस्थिती उदभवू शकते‘ असे म्हटले होते.
या मुलाखतीत बोलताना अडवानी म्हणाले, ‘एका नेत्यासाठी जनतेचा विश्वास टिकविणे ही सर्वांत मोठी जबाबदारी असते. नैतिकतेसाठी आवश्यक असतो तो राजधर्म, आणि सार्वजनिक जीवनात सत्यनिष्ठा कायम राखणे आवश्यक असते.‘