काकरदरा ठरले जलसंधारणाचे ‘मॉडेल’

0
26

नागपूर,दि.13-:पाणी टंचाईचा सातत्याने सामना करताना आपले गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण व्हावे यासाठी ‘सत्यमेव जयते’च्या ‘वॉटरकप’ स्पर्धेमध्ये सहभागी होऊन संपूर्ण गाव जलयुक्त करण्याचा अभिनव उपक्रम वर्धा जिल्ह्य़ातील अतिदूर्गम, संपूर्ण आदिवासीबहुल काकरदरा गावाने यशस्वीपणे राबविला आहे.या अभियानाने शासनाच्या जलयुक्त अभियानालाही बळ मिळाले आहे. यासोबतच आर्वी तालुक्यातील २२ गावांनीही ‘वॉटरकप’ स्पर्धेत सहभागी होऊन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.
पहिल्याच पावसात या गावांमध्ये राबविलेल्या विविध उपक्रमात जलसाठा निर्माण झाल्यामुळे गावकरी आनंदित झाले आहेत. या गावाचा आदर्श घेत तालुक्यातील सावंगी (पोड), पिंपळखुटा, माडेगाव (टेका), बोथली (किन्हाळगाव), सावद, विरुळ, रसुलाबाद, दिघी, रोहणा, बेढोणा, बेल्लारा, वाढोणा, दहेगाव (मुस्तफा), तळेगाव (रघुजी), पानवाडी, बोरगाव (हातला), उमरी (सुकडी) या गावातही जलसंधारणाची कामे मोठय़ा प्रमाणात पूर्ण झाली आहेत. सत्यमेव जयतेच्या ‘वॉटरकप’ स्पर्धेच्या निमित्ताने ‘जल है तो कल है’ हा एकच ध्यास घेऊन पाण्यासाठी पुढच्या पिढीला त्रास होऊ नये यासाठी जलयुक्त शिवारसाठी हजारो हात एकत्र आले आहेत. उद्देश केवळ आपले गाव जलयुक्त आणि केवळ जलयुक्त करण्याचा.
काकरदरा जलदेवतेचे गाव म्हणून संपूर्ण राज्यात ओळखले जात आहे. सत्यमेव जयतेची ‘वॉटरकप’ स्पर्धा जाहीर झाल्यानंतर नागपूर विभागात केवळ आर्वी तालुक्याने पुढाकार घेऊन काकरदरासह २२ गावांनी स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्धार केला. आर्वीचे सुमित वानखेडे तसेच त्यांच्या युवा सहकार्‍यांच्या दीड महिना अथक प्रयत्नानंतर २२ गावात जलसंधारणाची विविध कामे यशस्वीपणे पूर्ण झाली. सरपंच व ग्रामस्थांचा सहभाग मिळाल्यामुळे लोकसहभागातून करावयाच्या विविध कामांना चांगला प्रतिसाद मिळाला. या संपूर्ण उपक्रमाची प्रेरणा ठरले काकरदरा.
काकरदरा या गावच्या जलसंधारणाच्या विविध उपक्रमामुळे या गावात मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा निर्माण होणार आहे. यामध्ये सलग समतलचर (सीसीटी) बांधकामामुळे ७५.८४ घनमीटर, कंटुर बांधकामामुळे २ हजार ९३८.६४ घनमीटर तसेच अनघड दगडी बांधामुळे ९१९.0६ घनमीटर कामामुळे मोठय़ा प्रमाणात जलसाठा निर्माण होणार आहे. ही संपूर्ण कामे ग्रामस्थांनी सकाळी ६ ते रात्री उशिरापर्यंत र्शमदानाने पूर्ण केली आहेत. अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच होत आहे. र्शमदानाबरोबरच लोकसभागातून मशिनद्वारे खोल, समतल, पातळीचर, शेतीबांध बंदिस्ती, कंपॉर्मेंट बंडिंग, कंटुर बंध, शेततळे, लहान माती बंधारा, माती नाला बांध, नाला खोलीकरण व रुंदीकरणाची सरासरी ५६ हजार ६६५.८९ घनमीटरची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी दिली. काकरदरासोबतच पिंपळगाव (भोसले), नेरी (मिर्झापूर), बोथली (नटाळा) या गावानेही काकरदराचा आदर्श पुढे नेऊन नाला खोलीकरण, रुंदीकरण, शेततळे, कंपॉर्मेंट बंडिंग, लहान माती बंधारा, दगडी बांध अशी प्रत्येक गावात सरासरी ६0 हजार ते ६५ हजार घनमीटरची कामे पूर्ण केली आहेत. त्यासोबत गावात शोषखड्डे व प्रत्येक गावात वृक्षारोपणासाठी सरासरी चारशे ते पाचशे खड्डे खोदून वृक्षरोपणाला सुरुवात केली आहे.