दादासाहेब कुलगुरूच नव्हे तर सामजिक विद्यापीठही

0
15

नागपूर,दि.13 : लोकसेवेचा वसा घेत दादासाहेब काळमेघ यांनी नागपूर विद्यापीठाला सामाजिक चेहरा दिला. दादासाहेब कुलगरु तर होतेच मात्र ते चालतेबोलते सामाजिक विद्यापीठही होते, असे गौरवोद्गार भारतीय आयुर्र्विज्ञान परिषदेच्या अकॅडमिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी काढले.
स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने दादासाहेब काळमेघ यांच्या ८५ व्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष आणि माजी मंत्री वसंतराव धोत्रे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार वसंतराव खोटरे, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, डॉ.रामचंद्र शेळके, अ‍ॅड. कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, शरद काळमेघ, हेमंत काळमेघ आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. मिश्रा म्हणाले, समाजातील प्रस्थापितांना दोष न देता विस्थापितानांच प्रस्थापित बनवून समाजात सामाजिक समतोल घडवू शकणारे दादासाहेब अजब रसायन होते. दादासाहेबांच्या स्पर्शाने सर्वसामान्यांचे जीवन पालटले. त्यांचा प्रतिनिधी म्हणून बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी यावेळी आयोेजकांचे आभारही मानले. माजी मंत्री धोत्रे यांनी डॉ. पंजाबराव देशमुखानंतर दादासाहेब काळमेघ यांनी केलेल्या कार्याचा गौरव करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद काळमेघ यांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या ओजस्वी इतिहासाला उजाळा देत तिथे कारकीर्द गाजविणाºया अध्यक्षांच्या कामाला यावेळी सलामी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन भारसाकळे यांनी केले. दादासाहेब काळमेघ यांच्या जयंतीउत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाºया विविध कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मंदा नांदूरकर तर पाहुण्यांचे आभार हेमंत काळमेघ यांनी मानले.