मतदार यादीच्या कामास आयोगाची 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

0
21

गोंदिया,दि.30 : देशपातळीवर सुरू असलेल्या मतदार याद्या अद्यावतीकरण कार्यक्रमांतर्गंत मतदारांच्या घरोघरी जावून नोंदणी करण्याच्या कामास होत असलेला विलंब पाहता, केंद्रीय निवडणूक आयोगाने या कामास आणखी पंधरा दिवस मुदतवाढ देण्याबरोबरच त्यामुळे या कामास गती द्यावी असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. आयोगाच्या या निर्णयामुळे बीएलओंना काहीसा दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने देशपातळीवर प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्यासाठी मतदार पुर्नरिक्षण मोहिम १ नोव्हेंबरपासून सुरू केली आहे. यात प्रत्येक मतदान केंद्र निहाय केंद्रस्तरीय अधिका-यांची (बीएलओ) नेमणूक करून मतदारांच्या घरोघरी जावूून सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने नवीन मतदाराची नोंदणी, दुबार व मयत मतदारांच्या नावात कपात, मतदान केंद्रातील बदल, मतदारांचे छायाचित्रे गोळा करणे अशी कामे प्रत्येक घरोघरी जाऊन करणे अपेक्षित धरले आहे. शिवाय मतदारांची संपुणर्ल माहिती आॅनलाईन भरून, त्याच्या निवासाचे अक्षांश-रेखांश देखील नमूद करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. या कामासाठी सर्वच शासकीय कर्मचा-यांची नेमणूक करण्याचे शासनाचे आदेश असले तरी, जिल्हाधिका-यांनी शिक्षकांवरच ही कामे सोपविली आहेत. मुळात नोव्हेंबर महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू असताना त्यात शाळेचे कामकाज सांभाळून मतदार याद्यांचे काम करण्यास शिक्षकांनी विरोध दर्शविला होता, त्यातच काही शाळेच्या सर्वच्या सर्व शिक्षकांना मतदार नोंदणीच्या कामात जुंपल्यामुळे शाळा ओस पडण्याच्या भितीपोटी संस्थाचालकांनीच शिक्षकांना मतदार यादीच्या कामापासून दूर ठेवले. परिणामी देशपातळीवरच मतदार याद्यांचे पुर्नरिक्षण धिम्या गतीने होत असल्याची बाब केंद्रीय निवडणूक आयोगाने अलिकडेच घेतलेल्या राज्यांच्या आढाव्यावरून स्पष्ट झाली. सर्वच ठिकाणी बीएलओंकडून कामे होत नसल्याचे सांगण्यात आल्याने आयोगाने आता ३० नोव्हेंबर ऐवजी १५ डिसेंबरपर्यंत मतदार याद्यांचे काम पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.