३६ हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा

0
16

गोंदिया,दि.30 : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत आत्तापर्यंत जिल्ह्यातील ३६ हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात आला आहे. त्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली. मात्र यानंतरही कर्जमाफीस पात्र ठरलेले शेकडो शेतकरी प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.
शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस प्राथमिक यादीत सुरूवातीला जिल्ह्यातील ७६ हजार शेतकरी पात्र ठरले होते. चावडी वाचन आणि अर्जाच्या छाननीनंतर यातील मोठ्या प्रमाणावर अर्ज अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारने जिल्ह्यातील ४६ हजार ६८७ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरल्याचे जाहीर केले होते. यापैकी आत्तापर्यंत एकूण ३६ हजार ४७६ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात आला. यामध्ये २३ हजार ६२७ थकीत कर्जदार व १२ हजार ८४९ नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. थकीत बाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यावर ७७ कोटी ७० लाख रुपये व नियमित कजफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर १८ कोटी २६ लाख असे एकूण ९५ कोटी ९७ लाख रुपये जमा करण्यात आले. कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर आहे. तर राष्टयकृत बँका फार माघारल्याचे चित्र आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी अजूनही १० हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे.