किल्ले रायगड प्लास्टिक मुक्ती पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविणार – रामदास कदम

0
15
  • समुद्र किनारा स्वच्छतेबद्दल पर्यावरणमंत्र्यांनी केले अलिबागकरांचे कौतूक
  • डम्पिंग ग्राऊंडच्या उपलब्धतेसाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन

अलिबाग,दि.20 :
 `संपूर्ण राज्यात अलिबागच्या समुद्र किनाऱ्या इतका स्वच्छ किनारा मी पाहिला नाही. अलिबागकरांनी अलिबाग समुद्र किनाऱ्याची राखलेली स्वच्छता पाहून मला आनंद झाला आहे, या स्वच्छतेबद्दल मी अलिबागकरांचे कौतूक करतो`, अशा शब्दात राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अलिबागकरांचे कौतूक केले. जिल्हाप्रशासनाने स्वयंप्रेरणेने पुढाकार घेऊन रायगड किल्ल्यावर प्लास्टिक मुक्ती केली आहे. हा पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवून राज्यातील सर्व गड किल्ले प्लास्टिकमुक्त करु, अशी घोषणाही श्री. कदम यांनी केली. अलिबाग शहराच्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने व्हावी यासाठी नगरपालिकेला डम्पिंग ग्राऊंड मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु, असे आश्वासनही श्री. कदम दिले.
श्री. कदम यांच्या उपस्थितीत आज सकाळी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम राबविण्याचे नियोजित होते. त्यासाठी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, आरसीएफचे उपमहाव्यवस्थापक राजू कुलकर्णी, आर.आर. लिमये, वरिष्ठ प्रबंधक पुरुषोत्तम तडवळकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कूटे आदी उपस्थित होते.
आमदार पाटील यांनी अलिबाग नगरपालिकेच्या कचरा विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राऊंड उपलब्ध नसून ते उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी केली. त्यानंतर श्री. कदम म्हणाले की, राज्यात प्लास्टिक बंदी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. प्लास्टिक बंदीचा कायदा होण्याआधीच जनतेचे प्रबोधन करुन स्वयंस्फूर्तीने प्लास्टिक मुक्ती, व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अलिबागसाठी डम्पिंग ग्राऊंड उपलब्धतेसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करु असे आश्वासनही दिले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन व सूत्रसंचलन संजय भुस्कुटे यांनी केले.

रायगड किल्ला प्लास्टिक मुक्त केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे कौतूक
अभिनव उपक्रम राबवून रायगड किल्ला प्लास्टिक मुक्त केल्याबद्दल श्री. कदम यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे कौतूक केले. रायगड प्रमाणेच राज्यातील अन्य किल्ल्यांवरही असाच उपक्रम राबवून राज्यातील सर्व गड किल्ले हे प्लास्टिक मुक्त करण्याचा मनोदयही श्री. कदम यांनी यावेळी व्यक्त केला.