मिलिंद एकबोटे अखेर शिक्रापूर पोलिस ठाण्यात शरण

0
4

पुणे,दि.23-– 1 जानेवारी रोजी पुण्यातील कोरेगाव भीमा येथे घडलेल्या हिंसाचाराचे आरोपी मिलिंद एकबोटे शुक्रवारी पोलिसांना शरण आले आहेत. एकबोटे स्वतःहून शिक्रापूर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मिलिंद एकबोटेने हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली होती. मात्र, या प्रकरणातील घटनेच्या चौकशीसाठी पोलिसांना त्याला अटक करण्याचे आदेश कायम होते. अखेर सर्व मार्ग बंद झाल्याने 53 दिवसानंतर एकबोटे स्वत:हून पोलिस ठाण्यात शरण आले.

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे याला सुप्रीम कोर्टाने चार दिवसापूर्वी 14 मार्चपर्यंत अटक न करण्याचा दिलासा दिला होता. कोर्टाने 14 मार्चपर्यंत एकबोटे यांना अंतरिम जामीन मंजूर करताना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घ्यावे किंवा अटक करावी असे निर्देश दिले होते. मुंबई हायकोर्टाने एकबोटे यांना जामीन देण्यास नकार दिला होता. नंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

एकबोटे यांनी दिलेल्या चिथावणीनंतर कोरेगाव-भीमा येथे दंगल उसळली, असा त्यांच्यावर आरोप आहे. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (अ‍ॅट्रॉसिटी) त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून चिथावणी देणे, दगडफेकीस प्रवृत्त करणे, लोकांना चिथावणी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे अटक होण्याच्या भीतीने एकबोटे यांनी पुणे सेशन कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र एकबोटे यांच्यावर दाखल असलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असेही कोर्टाने नमूद केले होते. अखेर 53 दिवसानंतर एकबोटे शिक्रापूर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी स्वत:हूनच शरण आलेला आहे.