शिष्यवृत्ती बंद करण्याचे फडणवीस सरकारचे षड्यंत्र: अशोक सोनोने

0
8

बुलडाणा,दि.10 : मागासवर्गीय, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती योजना बंद पाडण्याचे राज्यातील फडणवीस सरकारचे षडयंत्र असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केला आहे.

येत्या १५ मार्च रोजी शिष्यवृत्तीसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर भारिपच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सोनोने यांनी दिली. सोनाने म्हणाले, राज्यातील ५० लाख विद्यार्थी दोन वर्षापासून शिष्यवृत्ती पासून वंचीत आहे, त्यांचा हा हक्क हिरावून घेण्याचा सरकारचा कुटील डाव आहे. सामाजिक न्याय विभागात शिष्यवृत्तीमध्ये १८६८ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला. सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तसा अहवाल दिला आहे. हा भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करावी आणि कठोर शासन करावे, एससी, ओबीसी, इबीसी प्रवर्गातील सवलत मर्यादा वाढवावी, निर्वाह भत्त्यात दरमहा १५०० रुपये वाढ करावी, टाटा संशोधन संस्थेतील शिष्यवृत्ती योजना पूर्ववत सुरू करावी या विविध मागण्यांसाठी १५ मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा  काढला जाणार असल्याचेही सोनोने यांनी सांगितले.