‘कान्हा’त माओवाद्यांचा शिरकाव राष्ट्रीय प्रकल्पाच्या बफर झोनमधील कंदलामध्ये बैठक

0
15
खेमेंद्र कटरे, गोंदिया,,दि.१९मध्य प्रदेशातील कान्हा किसली या राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात माओवाद्यांनी शिरकाव केला आहे. प्रकल्पाच्या बफर झोनमधील कंदला गावात सहा दिवसांपूर्वी त्यांनी बैठक घेतली. गढी पोलिस चौकीअंतर्गत हे गाव येत असून लांजी तालुक्याला लागून आहे. छत्तीसगडच्या कबीरधाममधून हे माओवादी गढी परिसरात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर बालाघाट पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे. माओवादी कारवायांच्या विस्तारासाठी दंडकारण्याला समकक्ष जीआरबी (गोंदिया-राजनांदगाव-बालाघाट) या नावाने नवा विभाग तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत कार्यविस्ताराठीची ही बैठक होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पीपल्स वॉर ग्रुप या संघटनेच्या माध्यमातून आंध्र प्रदेशातून माओवादी चळवळीचा विस्तार करण्यात आला. पीपल्स वॉर ग्रुपच्या सुरुवातीच्या काळात दलम सदस्य असलेल्या गणपती, भूपती, रामकृष्णा यासारख्या नेत्यांच्या हातात आता चळवळीची सूत्रे आहेत. पीपल्स वॉर ग्रुप आणि माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर या दोन नक्षलवादी संघटनांच्या एकत्रीकरणातून भाकपा माओवादी ही संघटना अस्तित्वात आली. बस्तर, तेलंगण, गडचिरोली जिल्ह्यासह ओडिशाच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या दंडकारण्यात या नव्या संघटनेचा जोर वाढला. मात्र गेल्या तीन वर्षात ही संघटना माघारल्याचे दिसून आले. बस्तर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात माओवादी ठार झाले. अनेकांनी आत्मसमर्पण करून चळवळीकडे पाठ फिरविली. माओवाद्यांच्या केंद्रीय नेतृत्त्वाने याची गंभीर दखल घेतली. दंडकारण्याच्या समकक्ष नवा विभाग तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. २०१४पासूनच यावर काम सुरू झाले आहे. सध्या या नव्या विभागात सशस्त्र माओवाद्यांच्या विस्तारक प्लाटून सक्रिय झाल्या आहेत. मागील वर्षी गडचिरोलीतील चकमकीत ‘जीआरबी’संदर्भात मिळालेल्या दस्तावेजाच्या अभ्यासात यासंदर्भातील अनेक धक्कादायक बाबी पोलिसांच्या हाती लागल्या होत्या. आता मध्य प्रदेशातील कंदला गावातील माओवाद्यांच्या हालचालींनी यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
आदिवासीबहुल व पहाडाने वेढलेल्या कंदला गावात माओवाद्यांची एक तुकडी काही दिवसांपूर्वी थांबली होती. त्यांनी गावकऱ्यांकडून रेशन गोळा केले. त्यानंतर बैठक घेऊन सहकार्य करण्याचे निर्देश दिले. गावकऱ्यांशी बोलताना त्यांनी स्थानिक व छत्तीसगडी भाषेचा वापर केला. तर आपसात बोलताना तेलुगू भाषेत बोलत होते. यानिमित्ताने माओवाद्यांनी छत्तीसगडमधील आपले बस्तान मध्य प्रदेशातील बालाघाट-मंडला भागात बसविण्याचे प्रयत्न करीत असल्याचे समोर येऊ लागले आहे. विशेष म्हणजे, छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील २५० माओवादी भावे जंगल ते कवर्धापर्यंत सक्रिय आहेत.
सुरक्षा व्यवस्था नसलेली गावे लक्ष्य
ग्रामीण भागातील नागिरकांना रात्रीच्या वेळी माओवादी भीती दाखवून चौपालच्या माध्यमातून सरकारविरोधात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. माओवादी दलममध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतात. मात्र गावकऱ्यांनी माओवाद्यांचे आवाहन धुडकावून लावल्याची माहिती बालाघाटचे पोलिस अधीक्षक अमित सांघी यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. मध्य प्रदेशातील बालाघाट-मंडला भागात माओवाद पसरविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सुरक्षा व्यवस्था नसलेल्या भागावर माओवाद्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. पण, पोलिसांनी गोंदिया आणि राजनांदगाव पोलिसांशी संपर्क साधून ‘जॉइंट ऑपरेशन’ सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली.