महात्मा फुले समग्र ग्रंथाचे होणार पुनर्प्रकाशन, १२ वर्षांनी मिळाला मुहूर्त

0
23

पुणे,दि.31(विशेष प्रतिनिधी) : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समग्र साहित्याच्या पुर्नप्रकाशनाला अखेर तब्बल बारा वर्षांनंतर मुहूर्त मिळाला आहे. दोनशे पानांच्या नवीन मजकुरासह ११ एप्रिल रोजी महात्मा फुलेंच्या जयंतीदिनी या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.
राज्य शासनाने यापूर्वी महात्मा फुले गौरव ग्रंथ, महात्मा फुले समग्र वाङ्मय, शेतकऱ्यांचा आसूड अशी अनेक पुस्तके प्रकाशित केली होती. मोठ्या प्रमाणात मागणी असूनही या ग्रंथांचे पुर्नप्रकाशन करण्यात आले नाही. यासाठी युवा माळी संघटना आणि भिडे वाडा बचाव मोहिमेच्या वतीने राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावाही करण्यात आला होता.
महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीचे प्रमुख, ज्येष्ठ विचारवंत हरी नरके म्हणाले की, सुरूवातीच्या काळात राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने महात्मा फुले यांच्यावरील पुस्तके प्रकाशित केली होती. १९९१ मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. पुढे २००६ मध्ये दुसरी आवृत्ती आली. त्यानंतर राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडून महात्मा फुले प्रकाशन समितीने हे काम स्वत:कडे मागून घेतले. त्यामध्ये नव्याने काही गोष्टी आम्हाला समाविष्ट कराव्याशा वाटल्या. महात्मा फुले यांचे लेखन मोडी लिपीत असायचे. ‘शेतकºयांचे आसूड’ चे मूळ हस्तलिखित मोडीमध्येच होते. महात्मा फुले समग्र ग्रंथासह त्यांची पुस्तके देवनागरी लिपीमध्ये प्रकाशित झाली. आता महात्मा फुले समग्र ग्रंथ नव्याने प्रकाशित करताना २०० पानी मजकूर वाढविण्यात आला आहे. महात्मा फुले यांनी गव्हर्नर जनरलला लिहिलेली मूळ पत्रे छापण्यात आली आहेत. महात्मा फुले हयात असताना जे ग्रंथ प्रकाशित झाले होते. त्या ग्रंथाला कुणाकुणाच्या प्रस्तावना होत्या त्यांचा समावेश यात केला आहे. वृत्तपत्रात महात्मा फुले यांनी जे रिपोर्ट लिहिले होते, त्याचाही उल्लेख आहे. महात्मा फुले यांच्या मुलाने लिहिलेले चरित्र, फुलेंचा सयाजीराव गायकवाडांशी पत्रव्यवहार या गोष्टींचा समावेश यामध्ये आहे.