भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसह सर्व निवडणुका आघाडी एकत्र लढणार-खा.पटेल

0
11

गोंदिया दि.१५ :: भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसह येत्या सर्व निवडणुका राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त आघाडी करुन लढेल.तर कुठल्याही मतदारसंघाच्या फेरबदलाची चर्चा जेव्हा केव्हा होईल तेव्हा ती आपल्याच उपस्थितीत होणार असल्याने हा मतदारसंघ काँग्रेसला जाणार की आमच्याकडे राहणार हे तेव्हाच स्पष्ट होणार असल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सोबतच राज्यातील भाजप सरकारला सत्तेवर येऊन चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. सत्तेवर येण्यापूर्वी आणि आल्यानंतर या सरकारने दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. सर्व सामान्यांसाठी केवळ मोठ्या मोठ्या घोषणा करून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली नाही. तर मुख्यमंत्री केवळ गोड बोलतात मात्र प्रत्यक्षात काही कृती करित नसल्याने विकास कामे रखडली आहे. केवळ गोड बोलून होत नाही तर प्रत्यक्ष कृतीची जोड द्यावी लागते अशी टिकाही खा.पटेल यांनी यावेळी केली. पत्रकार परिषदेला माजी.आमदार राजेंद्र जैन, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी उपस्थित होते.
खा. पटेल म्हणाले, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ जेव्हापासून आघाडी आहे,तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे त्यात बदल होण्याचा प्रश्न नाही. तसेच निवडणूक आयोगाने येथील निवडणूक जाहीर केल्यास दोन्ही पक्ष आघाडी करुन लढतील.मात्र भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची पोटनिवडणूक झाल्यास आपण स्वत: लढविणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्ष उमेदवार ठरवेल. अद्यापही कोणत्याही उमेदवाराचे नाव निश्चित झाले नसल्याचे सांगितले.उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पाटीर् आणि बहुजन समाज पार्टीने एकत्र येऊन लढल्याने भाजपाच्या उमेदवाराचा दारुन पराभव झाला. त्यामुळे हाच प्रयोग २०१९ च्या निवडणुकीत केल्यास चित्र वेगळ असू शकते. त्यादृष्टीने सर्व विरोधकांमध्ये वातावरण तयार होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

खा. पटेल म्हणाले, शासनाने आत्तापर्यंत जेवढ्या योजनांची घोषणा केली. त्यापैकी एकही योजना सुरळीतपणे सुरू नाही. शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेची देखील तिच स्थिती आहे.शेतकरी कर्जमाफीतील घोळ अद्यापही संपलेला नसून आत्तापर्यंत केवळ २५ टक्केच शेतकऱ्यांना प्रत्यक्षात त्याचा लाभ मिळाला आहे. निवडणुकीपूर्वी जनतेला मोठी मोठी आश्वासने देणाºया केंद्र व राज्यातील सरकारने सांगता येईल असे एकही काम केले नाहीे. मागील चार वर्षांत गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासाला खिळ बसली. एकही नवीन उद्योग स्थापन करण्यात आला नाही. हे सरकार केवळ घोषणाबाज असल्याचा आरोप पटेल यांनी केला.
एमआयटी बंद करण्याचे दुख:च
मागील काही दिवसांपासून येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय (एमआयटी) बंद होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याला खा. प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दुजोरा दिला. देशपातळीवरील अभियांत्रिकी महाविद्यालय असलेले हे महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय काही तांत्रिक अडचणीमुळे जड अतंकरणाने घ्यावा लागत आहे. हे महाविद्यालय बंद व्हावे अशी आपली मुळीच इच्छा नाही. मोठ्या मेहनतीने आणि दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी हे महाविद्यालय सुरू केले. त्यासाठी भरपूर मेहनत घेतली. त्यामुळेच या महाविद्यालयाचा सर्वत्र लौकीक सुध्दा आहे. मात्र आता काही तांत्रीक अडचणी निर्माण झाल्याने व प्रवेशांची संख्या कमी झाल्यानेच हा निर्णय घ्यावा लागत आहे. याचे मला मनापासून दुख: होत असल्याचे पटेल यांनी सांगितले.राज्यात सुमारे 2 लाख जागा अभियात्रिंकीच्या दरवर्षी रिक्त राहत आहेत.सोबतच शिष्यवृत्तीचे पैसे दोन ते तीन वर्ष मिळत नसल्याने शैक्षणिक शुल्क मिळत नसल्याने महाविद्यालय चालविणे त्यात प्राध्यापक व कर्मचारी यांचे वेतन करणे कठीण चालल्याचे म्हणाले.