कर्जाला कंटाळून युवा शेतकर्‍याची आत्महत्या

0
4

लाखांदूर,दि.16ःदोन दिवसांपूर्वीच पवनी तालुक्यातील वाही येथील तरूण शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेची शाई वाळत नाही, तोच पुन्हा लाखांदूर तालुक्यातील सरांडी/बु. येथील तरूण शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना (दि. १४) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.
सचिन उध्दव तिघरे (३५) रा. सरांडी/बु. असे मृतकाचे नाव असून या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. लाखांदूर तालुक्यातील सरांडी/बु. येथील तिघरे कुटुंबाकडे १२ ते १५ एकर सामाईक शेती असून सचिन व त्याचे भावाने सेवा सहकारी संस्था व अन्य बॅंकांकडून शेतीसाठी कर्ज घेतले होते. परंतु, गेल्या ३ ते ४ वर्षांपासून नापिकीमुळे घेतलेले कर्ज परतफेड करू शकले नाही. त्यामुळे सचिन हा नेहमी विवंचनेत राहत होता. अशातच शनिवारी त्याने शेतामध्ये विषप्राशन केल्याची माहिती गावकर्‍यांना व नातेवाईकांना होताच, त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने लगेच त्याला लाखांदूर येथील ग्रामिण रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सचिनकडे सरासरी २ ते ३ लाखांचे कर्ज असल्याचे बोलले जात आहे.
लाखांदूर पोलिसांनी पंचनामा करून सचिनचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयाकडे सोपविण्यात आले. त्यानंतर त्याच्या पार्थिवावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.