समग्र महाराष्ट्र ‘पाणीदार’ व्हावा : आमिर खान

0
7

नागपूर,दि.25 : महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यापैकी २४ जिल्ह्यात पाणी फाऊंडेशन अंतर्गत पाणलोट विकासाचे काम सुरू आहे. फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. लोक सहभागातून जनसमृध्दीकडे नेणारा हा प्रवास खरच नेत्रदीपक आहे. या प्रवासाचा सातत्याने विस्तार व्हावा आणि एक दिवस समग्र महाराष्ट्र ‘पाणीदार’ व्हावा, अशी अपेक्षा अभिनेता आमिर खान याने व्यक्त केली. मंगळवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत आमिरने पत्नी किरणसह वॉटर कप-२०१८ चा लेखाजोखा मांडला. आमिर पुढे म्हणाला, यंदा वॉटर कप स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे असा आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख, ५० लाख आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. पाणलोटसाठी यंदा २० हजार गावकऱ्यांना प्रशिक्षण दिले असून ते आपआपल्या गावात जाऊन इतर गावकऱ्यांना प्रशिक्षित करणार आहेत. ४५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गावकरी श्रमदानाने तसेच मशीनच्या सहाय्याने जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण रचना उभारून पाणी साठवण क्षमता निर्माण करणार आहेत, याकडेही आमिरने लक्ष वेधले.
१ मे ला महाश्रमदान
पाण्याच्या बचतीचा संदेश आणखी प्रभावीपणे देण्यासाठी पाणी फाऊंडेशनतर्फे १ मे रोजी महाश्रमदान आयोजित करण्यात आले आहे. या महाश्रमदानात सहभागासाठी आतापर्यंत सव्वा लाख जलमित्रांनी आपले नाव नोंदवले आहे. नावनोंदणीची ही प्रक्रिया २५ एप्रिलपर्यंत चालणार आहे, अशी माहिती आमिरने यावेळी दिली.
पाणी बचतीची ही मोहीम आम्ही स्वत:च्या घरापासून सुरू केली. मी आणि किरण दोघेही पाण्याचा काटकसरीने उपयोग करतो. इतकेच नाही तर आमचा मुलगा आझाद यालाही आम्ही हीच शिकवण दिली आहे. तो आता फक्त सहा वर्षांचा आहे. पण, त्यालाही पाण्याचे मोल कळते. तो अजिबात पाणी वाया घालवत नाही, हे आमिरने आवर्जून सांगितले.